लग्नाच्या आमिषाने शरीरसबंध बलात्कारच (भाग-१)
सदर घटनेमधे आरोपी हा डॉक्टर व मुलगी डी. फार्मासी. झालेली होती. सदर आरोपीने त्या मुलीला भेटण्यासाठी बोलावले व घरी नेले. तेथे तिने प्रतिकार केला असतानादेखील आपण लग्न करु असे आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केला. सदर बलात्कार त्याने 29 एप्रिल 2013 ते 30 एप्रिल 2013 या एका दिवसात तीन वेळा केला व 30 एप्रिललाच संध्याकाळी तिला मैत्रीणीच्या घरी सोडले. मी 1 किवा 2 मे ला घरच्याशी लग्नाबाबत बोलुन घेतो असे त्याने तिला सांगीतले. त्यानंतर 5 मे पर्यंत तिने आरोपीला विचारले मात्र त्याने उत्तर देण्याचे टाळले त्यानंतर 6 मे ला तिने तिच्या कुटुंबीयाना याबाबत माहिती दिली. त्यानुसार कुटुंबीयानी त्याचे घरी जावुन लग्नाचा पर्याय ठेवला दोन्ही कुटुंबात वाटाघाटी झाल्या त्यानुसार आरोपीने 23 मे ला लग्नाची तयारी दर्शविली व 30 मे ला आपण विधी करु असे आश्वासन दिले. त्यानंतर 10 जूनला विधी करु असे सांगितले त्याही दिवशी विधी न करता 20 जुन 2013 ला विधी करु असे सांगीतले. त्यानंतर आरोपीने 20 जूनला पिडीतेला फोन करुन सांगीतले कि माझे लग्न 10 जून 2013 लाच प्रियांका सोनी हिचेशी झाले आहे. मग मात्र पिडीतेने 21 जून 2013 रोजी बलात्काराची तक्रार पोलिसात दिली. पोलिसानी मेडीकलसह सर्व अहवाल पाहून पुरावे गोळा करुन संबंधित आरोपीला अटक केली व त्याचे विरूध्द कलम 376 नुसार दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीने त्याचे लग्न प्रियांका बरोबर ठरले असतानादेखील पिडीतेने व तिच्या कुटुंबीयानी आपल्याला लग्नाचा आग्रह केला व आपण नकार दिल्याने खोटी तक्रार केली असा बचाव मांडला. मात्र सत्र न्यायालयाने सर्व पुरावे पाहुन आरोपीला 10 वर्षांची सक्त मजुरी व 50 हजार दंडाची शिक्षा जाहीर केली. पुढे उच्च न्यायालयातदेखील हाच निकाल कायम करणेत आला.
सर्वोच्च न्यायालयात आरोपीच्या वकिलानी सदर संबंध समतीने आले असुन तो बलात्कार ठरत नाही असा बचाव केला. त्यासाठी डॉ. धृवरम मुरलीधर सोनार विरूध्द महाराष्ट्र राज्य (2019) एस सी सी ऑनलाईन 3100, तिलक राज विरुद्ध हिमाचल प्रदेश (2016) 4 एस सी सी 140, दिपक गुलाटी विरुद्ध हरीयाणा (2013) 7 एस सी सी 675 ई खटल्यांचा संदर्भ देत संमतीने संबंध आले असल्यास बलात्कार ठरत नाही असा बचाव केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व खटल्याच्या निकालाचे विश्लेषणकरीत जर भारतीय पुरावा कायद्यातील सुधारीत कलम 114 (अ) व पुरावा कायद्याचे कलम 90 चा विचार केला असता 90 नुसार जर संमती भीती दाखवुन अथवा फसवुन किवा खरी परिस्थिती लपवुन घेतली असेल तर ती संमती ग्राह्य धरता येणार नाही असे स्पष्ट केले. आरोपी चा फसवण्याचा उद्देश होता की नाही हे देखील समजले पाहिजे अशा खटल्यात आरोपीचा उद्देश खरेच लग्न करण्याचा होता की नाही हे लक्षात घेतले पाहीजे असे स्पष्ट केले.
या खटल्यात आरोपीच्या पत्नीने आमचे लग्न एक वर्षापूर्वीच ठरले होते अशी साक्ष दिली. त्यानंतर आरोपी व पिडीत मुलीच्या कुटुंबीयामधे लग्नासाठी बोलणी चालु होती, पिडीतेला लग्नासाठी वारंवार तारखा दिल्या, घटनेनंतर आरोपीने तिच्या मैत्रीणीकडे सोडवल्याचे पुरावे सर्व बाबी आरोपीचा उद्देश तिला फसवण्याचा होता हे स्पष्ट करीत असल्याने आरोपी बलात्काराच्याच शिक्षेस पात्र असुन त्याची शिक्षा योग्यच आहे असे
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. जरी दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाले असले तरी बलात्काराचा गुन्हा गंभीर असल्याने आरोपीच्या शिक्षेत कसलीही सवलत दिली जावु शकत नाही असे ही स्पष्ट केले. एकुणच या निकालाने लग्नाच्या आमिषाने शारीरिक शोषणाला बळी पडलेल्या तरुणीना नक्कीच दिलासा मिळणार आहे.