पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत, बहि:स्थ व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण नोंदवले गेले नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे जवळपास सात हजारांवर विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्याची वेळ परीक्षा विभागावर आली. काही महाविद्यालयांच्या हलगर्जीपणाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदा जलद कार्यपद्धती राबवित लवकर निकाल जाहीर केला. पण, काही महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दिले गेलेले अंतर्गत गुणच ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाकडे नोंदवले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करायचा, असा प्रश्न परीक्षा विभागापुढे निर्माण झाला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी परीक्षा विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ज्या महाविद्यालयांकडून असे गुण भरावयाचे राहून गेले आहेत, अशा महाविद्यालयांना ऑनलाइन गुण नोंदविण्यासाठी लिंक खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महाविद्यालयांना 8 ते 10 ऑगस्ट या तीन दिवसांत महाविद्यालयांना गुण नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
महाविद्यालयांवर कारवाई करावी
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिले गेलेले गुण वेळेत नोंदवणे अपेक्षित आहे. मात्र, काही ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना निकालास प्रतीक्षा करावी लागत आहे. यात विशेषत: कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा समोवश आहे. वेळावेळी सूचना देऊनही वेळेत कार्यवाही होत नसेल, तर अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.