नागपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रात पडलेली आहे. जालना येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत असून, मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी संवर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी केलेली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने या मागणीचा विरोध करीत संविधान चौकात धरणे देऊन निषेध केला.
जरांगे पाटील आधी ट्रकभर पुरावे देतो म्हणत होते. आता वंशावळीचे पुरावे का देत नाहीत, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. राजकीय पक्षांनी कुणब्यांना गृहीत धरू नये, असा इशाराही देण्यात आला. सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या मागण्यांवर सरकारने त्वरित विचार करून त्या मान्य कराव्या याकरीता 11 सप्टेंबर 2023 पासून ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्याला संपूर्ण ओबीसी संघटनाचा पाठिंबा आहे.
ओबीसी समाजात याबद्दल आधीच अस्वस्थता आहे. वंशावळ किंवा 1965 च्या पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये मराठा म्हणून नोंद असल्यास मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र सरसकट दिल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा नेत्यांनी दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता व ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी वक्त्यांनी केली. सरकारने त्वरित उपरोक्त मागण्या पूर्ण न केल्यास 17 सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.