छत्रपती संभाजीनगर – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारी रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये मुख्य रस्त्यावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात पहिल्यांदाच मुस्लिम नागरिक समाविष्ट झाले होते.
मराठा समाजाला शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, हा निर्णय म्हणजे समाजाची फसवणूक असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीने केला जात आहे. त्यामुळेच शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात आले. शहरात जळगाव रस्ता, मुकुंदवाडी, धुळे, सोलापूर महामार्ग यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सगेसोयरे अध्यादेश लागू करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा बीड, जालना, सोलापूरसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन पुकारले. मराठा समाजाची फसवणुक केली जात असल्याचा आरोप करत लवकरात लवकर सगे सोय-यांचा अध्यादेश लागू करून ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, याआधी सरकारने अशाच पद्धतीने स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारने तसाच निर्णय दिला असून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात जाण्याची भाषा वापरली आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर शंका येत असल्याने आजचा रास्ता रोको केल्याची भावना मराठा समाजाने व्यक्त केली.
अंतरवाली सराटीत आज महत्त्वाची बैठक
मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी 25 फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी रास्ता सुरू असताना दिली. सरकार प्रत्येक वेळेस फसव्या घोषणा करत आहेत, त्यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यापुढे आंदोलनाची दिशा ठरवतील. त्याचप्रमाणे सर्व समाज पुढे जाईल. त्यामुळेच रविवारी होणारी बैठक महत्त्वाची असून त्यात होणारी निर्णय आम्ही मान्य करुन, अशी भूमिका मराठा समाजाने यावेळी व्यक्त केली.