महाड : आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आरक्षणासाठी हे आंदोलन निश्चित आहे. त्याची सुरवात 16 जूनला पहिला मोर्चा काढून कोल्हापुरात करण्यात येईल, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एल्गार पुकारला.
मराठा समाजाने आज मराठा आरक्षणाचे नेतृत्व खा. संभाजीराजे यांच्या कडे सोपविले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केवळ कोल्हापुरातच नव्हे तर राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येईल छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून 16 जूनला पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.
या आंदोलनात पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. सामान्य माराठा जनतेने रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन करून राजे म्हणाले, तुम्ही आजपर्यंत संभाजी छत्रपतींना संयमी बघितले आहे. आजपासून तो संयम मी बाजूला ठेवला आहे.
खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिली जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची आहे. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवे की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचे. कोविड संपल्यानंतर देखील तुम्ही ठोस पावले उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढेल. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी छत्रपतींचे वंशज संभाजी राजे यांना मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, असेही संभाजीराजे यांनी ठणकावले.
2007 पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. ज्या सुखाने बहुजन समाज नांदत होता, मराठा समाज नांदत होता, तो आज का नाही. म्हणून मी मराठा समाजासाठी बाहेर पडलो. किती आंदोलने केले. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. तो एसईबीसीमध्ये येऊ शकत नाही. म्हणून समाजाला मिळालेले आरक्षण काढून घेण्यात आले.
माझा लढा 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मागच्या सरकारचे लोक म्हणाले, आत्ताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचे सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला.
पत्रकार परिषदेमध्ये खा. संभाजीराजे यांनी विस्ताराने आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षण आंदोलन हे राजकारण विरहित असेल. त्यामुळे सर्व राजकीय पक्षानी या आंदोलनात सहभागी व्हावे असे ते म्हणाले.
आमचा लढा कुणाविरुद्धही नाही. मी कुणालाही वेठीस धरत नाही. मराठा समाजाला न्याय द्या हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी आमच्या केवळ पाच मागण्या आहेत. त्या मान्य करण्यात सुप्रिम कोर्टाचा कोणताही अडथळा येणार नाही. मात्र त्यासाठी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाने एकत्र येणे आणि सर्व ताकद लावणे आवश्यक असल्याचे खा. राजे म्हणाले.
या पत्रकार परिषदेला सकल मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंडरे ,रघुनाथ चित्रे पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करन गायकर, प्रदीप देशमुख, आपासहेब कुडेकर, माऊली पवार, गंगाधर कालकुटे, देवरस्कर, नाना निवंगुने , अनिल तादगे, राजेंद्र कुंजीर , रमेश केरे ,धनंजय जाधव , तुषार जगताप आदी उपस्थित होते.
नेतृत्व संभाजीराजेंकडे
रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून परत जात असताना खा. संभाजी राजे आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांची एक बैठक महाड – रायगड मार्गावरील हॉटेल समर्थ येथे झाली. या बैठकीत आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व खा. संभाजी राजे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय मराठा समाजाच्या नेत्यांनी घेतला. एवढ्यावरच न थांबता आरक्षणाच्या मुद्यावरून जर कोणी खा. संभाजीराजे यांच्यावर टीका केली तर ती टीका मराठा समाजावर केल्याचे समजून त्यांना उत्तर देण्यात येईल असा इशाराही मराठा नेत्यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही राजे (खा. संभाजीराजे आणि खा. उदयनराजे ) एकत्रच आहेत असा विश्वासही त्यांनी यावेळेस दिला. आपण त्यांनाही भेटणार असल्याचे ते म्हणाले.