राहुरी – गुन्हेगारी पोसणाऱ्या प्रवृत्तींना प्रशासन पाठीशी घालत आहे. त्यामुळे समाजात अशांतता पसरत आहे. सामान्य जनतेवर जर खोटे गुन्हे होत असतील तर ते सहन केले जाणार नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यावर आमचा विश्वास असल्याने हा पहिला व शेवटचा मोर्चा शांततेच्या मार्गाने आम्ही आणला याची दखल पोलीस प्रशासनाने घेऊन खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी. खोटे गुन्हे मागे घेऊन अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा आमच्या मार्गाने प्रश्न हातात घेऊन ते सोडावे लागतील असे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.
राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल राजमुद्रा या बारमध्ये झालेल्या वादातून हॉटेल मालक प्रशांत व विशाल मुसमाडे या बंधूंच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ व तो खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी राहुरी तालुका पोलीस ठाण्यावर मराठा व बहुजन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चा निघाला. यावेळी फुले शाहू आंबेडकर यांच्या लोक राज्यात चाललंय तरी काय, कायदा व सुव्यवस्थेचा बोऱ्या वाजला आहे. अशा भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केल्या.
पोलीस सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची अपयशी ठरले असून गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. मुसमाडे बंधूवर दाखल झालेला ऍट्रॉसिटी गुन्हा मागे घ्यावा नाहीतर मोर्चेकऱ्यांवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. हजारोच्या संख्येने लोक मोर्चात सामील झाले होते. नगराध्यक्ष कदम म्हणाले, देवळाली प्रवरा मधील नागरिकांनी याआधी पोलीस प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी कितीतरी वेळा आंदोलने केली. आपल्या मागण्या याआधी मांडल्या आहेत. परंतु तरीदेखील धिम्म झालेल्या पोलीस प्रशासन याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेत नाही. देवळाली शहरांमध्ये तसेच राहुरी तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे व गुन्हेगारी वाढली असून त्यावर अंकुश आणणे गरजेचे आहे.
यासाठी प्रशासनाने येत्या आठ दिवसांमध्ये काही कारवाई केली नाही तर आज मोर्चामध्ये सहभागी झालेले हजारो तरुण तसेच नागरिक उपस्थित आहेत हे सर्व आठ दिवसानंतर स्वतः कायदा हातात घेऊन त्यांच्या परीने गुन्हेगारी व अवैध धंदे करणाऱ्यांवर ती कारवाई करतील. हा मोर्चा कोणा एका समाजाच्या विरोधात नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या सर्व समाजातील वृत्ती विरुद्ध आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, सत्यवान पवार, देवळालीचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, मराठा एकीकरण समितीचे सुनील ठुबे, मराठा महासंघाचे अनिल तनपुरे, नितीन पानसरे, मराठा छावा संघटनेचे देवेंद्र लांबे, अनिल आढाव आदींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
मोर्चामध्ये नगरसेवक सचिन ढूस, बाळासाहेब खुरुद, शैलेंद्र कदम, गणीभाई शेख संजय बर्डे, ज्ञानेश्वर वाणी, आदिनाथ कराळे , तुषार शेटे, विजय गव्हाणे दादासाहेब पवार, राजेंद्र उंडे, जयेश मुसमाडे, शिवाजी कपाळे, सूर्यकांत भुजाडी , नितीन कल्हापुरे, रमेश म्हसे, सुधाकर कदम, सागर खांदे, भागवत मुंगसे, डॉ. संदीप मुसमाडे, ऍड. प्रशांत मुसमाडे, तुषार भुजाडी, अनंत कदम आदी मोर्चात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सचिन ढुस यांनी केले तर आभार विष्णू गीते यांनी मानले.