Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारला असून, अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती नुकतीच जरांगे यांनी दिली. 20 जानेवारीला सकाळी 9 अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी व्हायचं आहे. असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अश्यातच आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “या आंदोलनाला येणाऱ्या आंदोलकांना सरकारने अडवलं किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत जाणारं धान्य, दूध बंद करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आमचा गॅस बंद केला तर लाकडं पेटवू, असं जरांगे म्हणाले.
‘त्यांनी आमच्या गाड्यांना डिझेल दिलं नाही, त्यांनी आम्हाला गॅस घेऊ दिला नाही, आमचं नेट बंद केलं, आम्हाला तेल-मीठ घ्यायचे दुकानं बंद केले, तरी आम्ही बिगर डिझेलवर गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. हे कोणालाच माहिती नाही. तिथे बिगर डिझेलच्या गाड्या दिसतील. त्यांनी गॅस बंद केला तर आम्ही चूल पेटवू. पण तुमचं दूध बंद होणार.
आमचा मायबाप मराठा शेतकरी तुम्हाला दूध देणार नाही. आम्ही इकडे त्याचं तूप, दही करु, पण तुम्हाला देणार नाही. तुम्ही बाजरी, गहू खायचेच नाहीत, ते सुद्धा देणार नाहीत. सोयाबीनही देणार नाही. आम्ही दाळी देणं बंद करु. तुम्ही त्या टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्या खायच्या. तुम्हाला दुसरा चान्सच नाही. तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल, तसा तुम्हाला त्रास होईल.’ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.