जालना – मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यादरम्यान, 14 ऑक्टोबर रोजी येथील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली होती. या सभेला लाखों मराठा बांधव आले होते.
एवढ्या मोठ्या संख्येने लोक एका छोट्या गावात जमल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 32 लाख रुपये दिले जाणार आहे. 441 बाधित शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत दिली. मनोज जरांगे पाटील यांनीही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सोडले आहे. मागील वेळी 17 व्या दिवशी तर यावेळी 9 व्या दिवशी त्यांचे उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले. सध्या सरकारला जरांगे पाटील यांच्याकडून दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षणाचा तोडगा काढू, मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन सरकारने दिले आहे.
सभेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच मदत –
एखाद्या आपत्तीत झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. एखाद्या सभेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रघात नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा उभारण्यात आलेला प्रामाणिक लढा आणि त्यात समाजबांधवांनी घेतलेला उत्स्फुर्त सहभाग लक्षात घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकसान भरपाई चा निर्णय घेतला. यामुळे शेतजमीनीचे सभास्थान म्हणून वापरल्याने झालेल्या नुकसानासाठी संबंधित 441 शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचे शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.