माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी टोचले कान
नवी दिल्ली : भारताच्या स्वायत्त लोकशाहीत्मक संस्थांना पाठबळ दिले पाहिजे आणि त्यांनी देशाच्या घटनेचे रक्षण केले पाहिजे, अशी अपेक्षा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली.
सुबुध्द नागरिकांच्या हातात देशाचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे आणि गरज असेल तेंव्हा त्याचे सर्वांनी रक्षण केले पाहिजे, हे या देशातील तरूणाईने अलीकडे देशाला दाखवून दिले आहे. माजी केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार यांच्या ह्युमन डिग्निटी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मनमोहनसिंग बोलत होते. ते म्हणाले, मूलभुत स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असता अनेक वेळी आमच्या उदार आणि उदारमतवादी लोकशाहीतील संस्थांची परीक्षा बघीतली गेली. अशा संस्थांना बळ देऊन त्यांनी घटनेचे संरक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.
कायद्याच्या राज्यात कायद्याने नागरीक समान पातळीवर राहिले तरच स्वातंत्र्याची कल्पना आकार आणि रूप धारण करू शकेल, असेही सिंग यांनी स्पष्ट केले. देशात सुधारीत नागरीकत्व कायद्याला (का) होणारा विरोध आणि त्या विरोधात केरळ विधानसभेने सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेली याचिका या संदर्भाने त्यांच्या विधानाला महत्व आले आहे.