बीड – अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करत आहेत. मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. यावरून शेतकरी संतप्त आहेत. दरम्यान, सत्तार यांच्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. अतिवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री सत्तार आणि अधिकाऱ्यांमध्ये दारूच्या चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळाले, यावरून शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनिषा कायंदे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलतांना मनिषा कायंदे म्हणाल्या,’अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान पहाण्यासाठी ते आले होते. मात्र ते तिथे जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात तुम्ही दारू पिता का? हा शिंदे गट नाही तर ‘झिंगे गट’ आहे असं म्हणावं लागेल अशी टीका कायंदे यांनी केली आहे. त्या पुढे म्हणाल्या,’सैराट झाल्यासारखी महाराष्ट्राच्या सत्तेत उलथापालथ घडवली. सत्ता स्थापन केली. आता दौऱ्यासाठी जाता आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारता दारू पिता का म्हणून असं म्हणत मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.’