श्रीकांत कात्रे
गावाकडची शेती आहे. पण सातत्याने दुष्काळाशी संघर्ष करीत वाटचाल करायला लागायची. मुलांच्या शिक्षणासाठी जवळच्या शहरात जाणे भाग पडले. शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. परंतु, आश्विनी सूर्यवंशी यांनी व्यवसाय करण्याचे निश्चित करून संसाराला आर्थिक उभारी दिली. मुले मोठी झाल्यावर काही तरी करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच या व्यवसायात त्यांनी जम बसविला. ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभी राहून आपल्या कुटुंबाच्या प्रगतीला दिशा देण्यासाठी कष्टमय प्रवास करत झटत राहते. त्यामुळेच आश्विनी यांचा संघर्ष वेगळा आहे.
ग्रामीण भागातील महिला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी मोठा संघर्ष करीत असतात. स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडत असतात. कष्ट करण्याची तयारी त्यांच्याकडे असते. पण काय करायचे याचा मार्ग शोधणे तसे अवघडच असते. कारण रोजगाराच्या संधी कमी असतात आणि व्यापार व्यवसाय करायचा तर स्पर्धाही असते.
पण स्थानिक गरजा लक्षात घेऊन काय करता येईल याचा नेमकेपणाने विचार करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम अनेक महिलांनी जिद्दीने केले आहे. म्हसवडच्या आश्विनी सूर्यवंशी या त्यापैकीच. जिद्दीने त्या स्वतःच्या ताकदीवर उभ्या राहिल्या आहेत. म्हसवडसारख्या शहरात त्यांनी स्वतःची लेडिज शॉपी उभारून आर्थिक स्थिरता मिळवली आहे. माण तालुक्यातील तुपेवाडी (वरकुटे) एक छोटे गाव. या गावात शेतीवर उपजिविका करणारे सूर्यवंशी यांचे कुटुंब तसे 15 जणांचे. दुष्काळामुळे व एकत्रित शेतीच्या उत्पन्नाला खूपच मर्यादा होत्या. त्यात मुलांचे शिक्षण लक्षात घेऊन जवळच 12 किलोमीटरवारील म्हसवड शहरात आश्विनी, त्यांचे पती व तीन मुलं दाखल झाले. शेतीमध्ये सतत काम करण्याची सवय असणाऱ्या आश्विनी सूर्यवंशी शहरात राहयला आल्या तरी कष्ट करण्याची सवय विसरल्या नव्हत्या. मुले मोठी होऊ लागली. तशा त्या विचार करू लागल्या घरात नुसते बसून राहण्यापेक्षा काही तरी केले पाहिजे. छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला पाहिजे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
काही व्यवसाय करावा असे वाटत होते. पण काय करायचे ते लक्षात येत नव्हते. समाजात मिसळण्याची, लोकांशी संवाद साधण्याची अशी संधी त्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे महिलांशी संबंधित असा काही व्यवसाय करावा असे ठरवून त्यांनी गरजा लक्षात घेऊन त्यांनी लेडिज शॉपी सुरू करण्याचे निश्चित केले. महिलांच्या कपड्यांपासून त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी त्यांनी या लेडिज शॉपच्या माध्यमातून सुरवात केली. अधूनमधून गावी जाऊन शेतीकडेही लक्ष द्यायचे आणि दुकानातील ग्राहकांनाही जपायचे असे त्यांचे काम सुरू झाले. दुकानात महिलांच्यादृष्टीने हरतऱ्हेचा माल आणावा लागतो.
गांधीनगर (कोल्हापूर) किंवा पुण्यातून तो माल आणायचा. त्याबाबतचे सर्व व्यवहार त्या पाहू लागल्या. माणदेशी फाउंडेशनचे काम म्हसवडमधूनच सुरू आहे. त्यामुळे अर्थातच आश्विनी यांचा माणदेशीशी संपर्क आल्यावर व्यवसायाला दिशा मिळाली. डीजिटल मीडियासह अंकाउंटस व व्यवसायासाठी आवश्यक गोष्टींचे मार्गदर्शन मिळण्याबरोबरच वेळोवेळी प्रोत्साहन मिळत गेले. व्हॉटसऍपवरून लोकांशी संपर्क वाढू लागला. विविध ऍप्सवरून व्यवसायासाठी पूरक जाहिरात होऊ लागली. व्हॉटसऍपचे ग्रूप तयार झाले. त्यामुळे व्यवसायाला चालना मिळत गेली. संवाद साधण्याची प्रक्रिया अधिक चांगली झाली. ग्राहकाला चांगल्या पद्धतीने पटवून सांगण्याच्या कलेने विक्रीला अनुकूलता मिळू लागली. लॉकडाऊनच्या काळात सर्वांप्रमाणेच त्यांनाही संघर्ष करावा लागला. मात्र, मोबाइलवरून ऑर्डर्स घेणे आणि त्या ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत त्यांनी आपली धडपड सुरू ठेवली होती. त्यामुळेच ऑनलाइन शॉपिंगसारखी सेवाही त्यांना देता आली. दुकानाचा गाळा आणि घर एकाच ठिकाणी आहे.
आणि स्वतःच्या मालकीचे आहे, ही मोठी जमेची बाजू त्यांना लाभली आहे. दुकानाचे काम सुरू असतानाच गावाकडेही लक्ष द्यायला लागते. शेतीमध्ये फळबागांसाठी त्यांनी महत्त्व दले आहे. दुष्काळी भागातील मुख्य पीक बाजरी त्या घेतातच. कांदा व लसूण त्याचबरोबर डाळिंब, सीताफळ, पेरू या फळांचे उत्पादन त्या मिळवतात. शेळ्या आणि कोंबड्यांचं पालन करून त्यापासूनही उत्पन्न मिळवतात. इतक्या प्रकारे कार्यरत राहणे म्हणजे सोपे नसते. पण आश्विनी यांनी मोठ्या मेहनतीने ते साध्य केले आहे. खेडेगावातून शहरात येत हळूहळू प्रगती साधणे कष्टाशिवाय आणि नियोजनाशिवाय होत नाही.
व्यवसायात जम बसविण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. अडचणी खूप आल्यापण काही तरी करून दाखवायची जिद्द त्यांच्या कामी आली. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात न ठेवता त्या संघर्ष करत राहिल्या. आलेल्या अडचणीवर मात करत पुढे चालत राहिल्या. यापुढील काळात त्यांना व्यवसाय अधिक वाढवायचा आहे. दुकानाचा गाळा मोठा करायचा आहे. नवीन फर्निचर बनवायचे आहे. लेडिज शॉपी मोठी करायची आहे. मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठं करायचे आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे. कष्ट करायची तयारी असली की सारे जमते, अडचणीतून मार्ग काढता येतो, असे त्या सांगत होत्या. म्हणूनच आश्विनी यांचा हा प्रवास इतरांसाठीही निश्चितच अनुकरणीय आहे.