मनुष्य आपल्याकडील कोणती गोष्ट मुक्तपणे इतरांना देऊ शकतो? तर त्याचे उत्तर असेल, “आनंद”! प्रत्येकाकडे या आनंदाचं कारण, प्रमाण मात्र भिन्न असतं. कुणाला आर्थिक, सांपत्तिक आनंद लाभलेला असतो तर कुणी शैक्षणिक गुणवत्तेने समृद्ध असतो. कुणाला गोड आवाज आनंद देऊन जातो तर कुणी सुंदर विचारांचे सृजन हाती घेऊन इतरांचे अश्रू पुसण्यात आनंद मानत असतो.
कसं असतं ना! आपल्या प्रत्येकाला कमी-जास्त प्रमाणात सुख मिळत असतं. दुःखही असतंच, पण आपण त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतच जगण्याचा छंद जोपासतो. मग या प्रवासात कुणाची ओंजळ भरत आलेली असते तर कुणाच्या ओंजळीचा तळही माखलेला नसतो. असा मनुष्य ती ओंजळ काठोकाठ भरण्यासाठी धडपडत राहतो. हा आनंद आपल्या अंतर्मनात रूजविण्यासाठी, इतरत्र त्याचे शिंपन करण्यासाठी मात्र साधनेची गरज असते. माणसाचे आयुष्य अगणित सुखःदुखाच्या रेषांनी व्यापलेले आहे. आनंद साधना करताना यातून फक्त सुखाच्या रेषा ठळकपणे अंतर्मनात नोंदवून ठेवायच्या असतात. जमल्यास या रेषांना महिरपी कंसातच टाकून ठेवायचे, किंवा आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचं तर या सुखाच्या रेषांना हॕशटॕग करून आपल्या आयुष्यात पोस्ट करायचं. त्याचबरोबर सतत फॉरवर्ड करून या सुखाच्या क्षणांचं सेलिब्रेशन करत राहायचं.
आपण कुणीही आपल्या आयुष्यात येणारे दुःख, वेदना सहजासहजी विसरू शकतच नाही. परंतू जाणीवपूर्वक या रेषा थोड्या पुसटच ठेवायच्या. कारण सुखात सुख, आनंद व दुःखात वेदनांची भावना वाढीस लागते. म्हणजेच, आपण जसा विचार करू तशा त्या त्या संबंधित रेषा वाढतात किंवा कमी होतात. आनंदाच्या प्रसंगी आपण जसे दुःखद आठवणींना बाजूला ठेवून आनंदी क्षण अनुभवतो तसेच दुःखाच्या प्रसंगी आपल्या आयुष्यात अनूभवलेल्या आनंददायी क्षणांना सातत्याने आठवत राहायचे. तरच त्यापुढेही प्रत्येक पावलावर आपल्या आयुष्यात सतत आनंद, समाधान आणि तृप्तीचा सुगंध दरवळत राहील. तसेच आपण कोणत्याही प्रसंगात मिळणारा आनंद बाजूला ठेवून, अप्रिय आठवणींना जवळ करत असू, मिळालेल्या गोष्टीचे समाधान न मानता; सातत्याने अवास्तव अपेक्षेने जगत असू तर त्या क्षणांचा अनुभव घेणे शक्य होत नाही. हाती आलेल्या गोष्टी सोडून, असमाधानी वृत्तीने पळत्या गोष्टींच्या मागे धावत असू तर सद्य परिस्थितीत मिळालेला आनंद, सुख, समाधानही आपल्या हातातून कधी निसटून जाईल, हे सांगता येत नाही.
आता आपण ठरवायचे की, यातले आपल्याला काय हवे, सुख की दुःख? आनंद की वेदना? समाधान की अपेक्षांचे ओझे वाहणारे मन? आनंद, समाधान व सुख-दुःखाची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांचे वाटप होणे गरजेचे दिसते. ही जी “देण्याची” भावना असते ती जगातली ‘दी बेस्ट’ गोष्ट असते. दातृत्व गुणाची आपल्या मनातील जोपासना आणि कृतज्ञतेची इतरांच्या मनातील जपणूक सातत्याने वाढीस लागणे गरजेचे असते. आपल्याकडे जे आहे ते किंवा त्यातला काही भाग दुसऱ्याला देता आला तर?
आपल्या आजूबाजूला असे काहीजण असतात, ज्यांच्या ओंजळीत आनंदाचे चांदणे भरभरून उमललेले असते. त्या चांदण्याच्या सुखद प्रकाशात त्यांचं आयुष्य उजळून निघालेलं असतं. ओंजळीतल्या अशा चांदणफुलांचा सुगंध जर इतरांनाही देऊ केला तर? द्यावाच तो, हे आनंदाचे चांदणे अगदी मनसोक्त उधळून टाकावे. कारण फुलांचं किंवा चांदण्याचं आयुर्मान ते किती असणार हो? या क्षणभंगूर मानवी आयुष्यात आणखी क्षणभंगूर असणाऱ्या चांदणफुलांचं मोल जाणून घ्यायला हवं. स्वतःची ओंजळ भरुन ओसंडू पाहात असेल तर आपल्या हातालाही हलकासा हिंदोळा द्यावा अन् समोरच्या हाताच्या ओंजळीतही आनंदाचे दान अलगद घालावे. अशा मोहक चांदणफुलांचा सुगंध चराचरात पसरून टाकला तर साऱ्या सृष्टीला आनंदाचे भरते आल्याशिवाय राहणार नाही.
फक्त स्वतःची ओंजळ भरण्याचे प्रमाण आपल्याला ठरवता आले पाहिजे. स्वतःच्या मनतृप्तीचे मोजमाप ठरवता आले पाहिजे. गरज आणि हाव यातले अंतर पार करून ज्याला मनभरुन जगता येते, ओंजळीतल्या आनंदफुलांच्या सुगंधाने इतरांचेही आयुष्य दरवळून टाकता येते त्या मनुष्याला आपल्या आनंदाच्या चांदण्याचे महत्त्व, खोली, आणि संपूर्ण आढावा नक्की समजतो. असा मनुष्य आपल्या ओंजळीत किती चांदणफुले आहेत हे न बघता, आजूबाजूला त्या आनंदफुलांची किती गरज आहे यानुसार आपल्या ओंजळीला हेलकावा देत राहतो आणि आनंदाच्या चांदण्याने इतरांचेही आयुष्य उजळत राहतो. यासाठी, ही आनंदफुले जास्तीतजास्त उमलण्यासाठी फार काही करण्याची गरजही नसते. फक्त आपल्या आजूबाजूला यांची किती गरज आहे हे सातत्याने पाहायचे आणि आपल्या मनाची कवाडं सतत उघडी ठेवायची. इतकं साधं, सरळ आहे हे गणित. मग आहे की नाही अगदी सोपी, ही आनंदसाधना?
-शुभांगी दळवी