पश्चिम मिदनापुर – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत मोदी सरकार वर आज येथील सभेत जोरदार निशाणा साधला. त्यांनी मोदी सरकारला इशारा देताना म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारने तीन शेती विषयक कायदे त्वरीत रद्द करावेत किंवा सत्ता सोडावी.
त्या म्हणाल्या की मी सिंगुरचे आंदोलन विसरलेली नाही. माझा शेतकऱ्यांना पुर्ण पाठिंबा आहे. त्या म्हणाल्या की आमचा भारत बंदला पाठिंबा नाही पण शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांचे आपण पुर्ण समर्थन करीत आहोत. पश्चिम मिदनापुर हा भाग तृणमुल कॉंग्रेसचे बंडखोर नेते सुवेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला समजला जातो आज ममतांनी तेथूनच भाजपवर निशाणा साधला आहे.
सुवेंदु अथिकारी हे तृणमुल कॉंग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी नुकताच ममतांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामाही दिला आहे. ते भाजप मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत असे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी तेथे सभा घेऊन भाजपला इशारा देण्याला राजकीय महत्व आहे. कालच त्यांचे या जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या संपर्कात असलेल्यांनी तृणमुल कॉंग्रेस पक्षाचा त्वरीत राजीनामा द्यावा असा सज्जड इशाराहीं अधिकारी यांचे नाव न घेता त्यांना दिला होंता.
भारतीय जनता पक्ष म्हणजे बंगाली संस्कृती बाहेरचा पक्ष असून या पक्षाच्या ताब्यात येथील जनता त्यांना कधीही राज्याची सत्ता देणार नाही असेही त्यांनी आज नमूद केले.