नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी-वढेरा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.
त्यांनी म्हटले की, मोदी सरकारकडे फालतूचा खर्च करयला पैसे आहेत मात्र, उत्तर प्रदेशच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत. मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
सरकार आर्थिकवाढ होण्यासाठी नवनव्या योजना आखात आहे, मात्र देशाच्या अन्नदात्याविषयी विचार करायला मोदी सरकारकडे वेळ नाही. त्यामुळेच सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिलेली नसावी, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
याबाबत प्रियांका गांधी-वढेरा यांनी ट्विट करीत म्हटले की, भाजपा सरकारकडे 20 हजार कोटी रुपयांचे नवे संसद कॉरिडोर बनवण्यासाठी आणि 16 हजार कोटी रुपयांचे पीएमसाठी खास विमान विकत घेण्यासाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत. 2017 सालापासून ऊसाचे मूल्य वाढविण्यात आलेले नाही.
मोदी सकार केवळ अब्जाधिशांच्या फायद्याविषयी विचार करणारे सरकार आहे.
प्रियांका गांधी-वढेरा यांनी ‘गाव’ अशा नावाचे एक पोस्टर लिंक केले आहे, त्यासोबत लिहिले आहे की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 12 हजार 994 कोटी रुपयांची नुकसान भरपाई बाकी आहे. यातील 10 हजार कोटी रुपये एकट्या उत्तर प्रदेशच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बाकी आहे.