हैदराबाद – महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगेसारख्या गावातील प्रत्येक घरातील किमान एक सदस्य तरी भारतीय सैन्यात असल्याचे पहावयास मिळते. या गावातील अनेक जण स्वातंत्र्यसंग्राम, 1942 चे छोडो भारत आंदोलन, पाकिस्तान युद्ध, चीन युद्ध आणि बांगलादेश मुक्ती संग्रामासह कारगिल युद्धात सहभागी असल्याचे देशाने पाहिले आहे.
अशाच प्रकारचं एक गाव आंध्र प्रदेशात असून प्रकाशम जिल्ह्यातील मल्लारेड्डी या गावातील प्रत्येक घरातला एकतरी सदस्य भारतीय सैन्यात सीमेवर तैनात असलाचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या मुस्लिम बहुल आहे; आणि तरिही भारतमातेच्या सेवेसाठी हे जवान आपल्या जीवाची बाजी लावायला जराही मागेपुढे पहात नाहीत.
या गावातून सहजच एक चक्कर मारली तरी प्रत्येक घराच्या भिंती शौर्याची कहाणीच सांगतील. अगदी चावडीच्या पारावर बसलेले कासिम अली सांगतात की, मी श्रीलंकेत पाठवलेल्या भारतीय शांती सेनेचा सदस्य होतो आणि किमान सहा महिने डोळ्यात तेल घालून तमिळ वाघांचे हल्ले परतवून लावायचो. अलाहाबादमध्ये लष्करी प्रसिक्षण घेतलेल्या कासिम अलींनी सिकंदराबाद येथे पहिले पोस्टींग़ स्वीकारले. मग 17 व्या जाट रेजिमेंटमध्ये भरती होत ते शिलॉंगमध्ये गेले. सेवेच्या अखेरच्या कालखंडात लडाख सीमेवर सेवा बजावलेले कासिम अली आज गावातील युवकांना भारतीय सैन्यात जाण्यासाठी प्रवृत्त करतात.
या लहानश्या खेड्यात एकूण 86 कुटुंबे राहतात आणि त्या कुटुंबांमधील एकूण 130 युवक भारतीय सेनेत सीमावर्ती भागात विविध ठिकाणी तैनात आहेत. एकदा तरी या देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या गावाची सफर करायलाच हवी.