सातारा – जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी “जलयुक्त शिवार’ योजनेतील कामे पूर्ण करावीत. जलसंधारणाची कामे दजेंदार आणि गतीने करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, कृषी समितीचे सभापती मनोज पवार, समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगौड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. संजीवराजे म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र, भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य द्यावे. जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पुढाकार घ्यावा.
या कामांचा दर्जा तपासावा. रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्या बदल्यात संबंधितांनी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष झाले
आहे. कराड-पाटण रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीस प्राधान्य द्यावे, अशी मागणी राजेश पवार यांनी केली. जेथे रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत, तेथे वृक्षलागवड करावी. त्रिपुटीच्या डोंगरावर ज्याप्रमाणे वृक्षलागवड झाली आहे, तशी लागवड सर्वत्र करावी, अशी मागणी अर्चना देशमुख यांनी केली.
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शौचालये नाहीत. जेथे सुविधा आहे, तेथे शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शौचालय स्वच्छतेसाठीही निधीची तरतूद करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. शाळांनी शौचालय उभारणीचे प्रस्ताव प्राधान्याने द्यावेत, ते तात्काळ मंजूर केले जातील, असे राजेश पवार यांनी सांगितले. सदस्यांच्या प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी उत्तरे दिली. प्रारंभी मागील सभेचा कार्यवृत्तांत कायम करण्यात आला. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेकडे आलेल्या शासन निर्णयांचे व परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण, पाणीटंचाई, जीवन प्राधिकरणाकडील नळपाणी पुरवठा योजना, महावितरण, संपूर्ण स्वच्छता या कामांचा आढावा घेण्यात आला.