मुंबई – किसन वीर कारखान्याला राजकीय हेतूने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वत:च्या मर्जीतील कारखान्यांना पात्रता नसतानाही अडीचशे, तीनशे कोटी दिले. सहकारात राजकारण असू नये हा संकेत राष्ट्रवादीकडून डावलला जात असून त्यातून सहकारातील कारखाने खासगी करण्याचा सपाटा लावला आहे. किसन वीर कारखान्यात जर वेगळा निकाल लागला तर राष्ट्रवादीचे लोक हा कारखाना पाव किमतीत खासगी करुन घेतील. किसन वीर कारखान्याला केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून मदत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असून किसन वीर कारखान्यावरील शेतकऱ्यांची मालकी टिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर हे आवाहन केले. ते म्हणाले, “”सध्या सहकारातील कारखाने स्वत:च्या खासगी मालकीचे कोण करत आहे, हे जनता ओळखून आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक काही कारखाने अडचणीत आणले जात आहेत. सहकारात राजकारण असता कामा नये. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मदन भोसले कॉंग्रेसमध्ये होते. तरीही राजकारण न पाहता मी किसन वीर कारखान्याला मदत केली. त्यावेळी मदन भोसले भाजपमध्ये येतील, असे वाटलेही नव्हते. सहकारातून शेतकऱ्यांची मालकी निर्माण झाली आहे आणि ती टिकली पाहिजे, हा संकेत या राज्यात पाळला जात होता. मात्र, मदन भोसले भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक अडचणीत आणले. राज्य सहकारी बॅंकेतून 125 कोटी रुपये मंजूरही केले होते.
देतो देतो म्हणून सांगितले जात होते. पण अचानकपणे एक दिवस बॅंकेचे धोरण बदलल्याचे सांगून त्यांना पैसे नाकारले. त्याचवेळी मर्जीतल्या कारखान्यांना मात्र मदत केली. ती करायला हरकतही नाही. मात्र, किसन वीर कारखान्याला जाणीवपूर्वक डावलले. याबाबत मी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवला.’ सभासदांची, कामगारांची व इतर देणी, पुढील हंगाम सुरु करण्यासाठी आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडून मदत मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रयत्न सुरु नाही.
तर यापूर्वीच केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात एनसीडीसीसाठी तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व प्रस्तावाची पूर्तता करुन तो नुकताच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला. त्यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. याबाबत किसन वीर कारखान्याला मदत झाली पाहिजे हा आग्रह धरला असून आमचा शब्द डावलला जाणार नाही. त्यामुळेच किसन वीर कारखान्याला मदतीची मी स्वत: खात्री देत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
किसन वीर कारखान्याने शक्य होतं तेव्हा एसएमपी, एफआरपीपेक्षा 400 कोटीहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली. प्रतापगड कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवताना तसेच शेतकऱ्यांच्या मालकीचा खंडाळा कारखाना, सहवीज निर्मिती प्रकल्प, डिस्टिलरीज, इथेनॉल असे विविध प्रकल्प उभारताना नाही म्हटलं तरी ताण आलाच. पण त्यांनी हे सारं उभारलं आणि शेतकऱ्यांच्या मालकीचं उभारलं हे लक्षात घ्यायला हवं. शेतकऱ्यांची ही मालकी टिकवण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी पॅनेलला विजयी करा, असेही आवाहन फडणवीस यांनी केले.