पुणे – ग्राहकांच्या सेवेसाठी भारतीय टपाल विभाग सहकार्य करण्यास प्रयत्नशील असते, याची प्रचिती एका घटनेतून मिळाली. काही कारणास्तव दुसऱ्या राज्यात माघारी गेलेले पार्सल दोन दिवसांत मागवत संबंधित व्यक्तीला सुपुर्द केले.
कात्रज भागातील आरती पाटील (नाव बदलले आहे) यांनी ऑगस्टमध्ये बॅंकेकडून एटीएम कार्ड मागवले होते. ते बंगळुरू येथून 20 दिवसांत मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार दि. 7 सप्टेंबर रोजी ते एटीएम कार्ड पाटील यांच्या घराजवळील टपाल कार्यालयात आले.
मात्र, अपूर्ण पत्ता आणि मोबाइल क्रमांक नसल्याने ते माघारी पाठवण्यात आले. त्या पार्सलची तातडीने आवश्यकता असल्याने आणि पुन्हा सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने पाटील यांनी वरिष्ठ पोस्टमास्तर बी. पी. एरंडे यांच्याशी संपर्क साधला आणि घडला प्रकार सांगितला.
तसेच “हे पार्सल मी मुख्य छाननी कार्यालयातून घेऊ शकते का?’ असे विचारले. त्यावर एरंडे यांनी “तुम्ही काळजी करू नका, तुमचे पार्सल मिळून जाईल,’ असे सांगितले. दरम्यान, टपाल विभागाच्या ऑनलाइन ट्रॅकिंगमध्ये ते पार्सल कर्नाटक येथील मूळ टपाल कार्यालयात पोहचल्याचे दिसत होते. त्यामुळे ते पार्सल पुन्हा मिळणार नाही आणि परत सगळी प्रक्रिया करावी लागणार, अशी काळजी पाटील यांना वाटत होती.
दरम्यान, एरंडे यांनी पाटील यांना फोन केला आणि ते पार्सल कर्नाटक येथून मागवल्याचे सांगितले. तसेच वीकेंड असल्याने सोमवारी ते मिळेल, असेही सांगितले. त्यानुसार सोमवारी त्यांनी स्वतः फोन करून “तुमचे पार्सल मी घेऊन ठेवले आहे, ऑफिसच्या वेळेत ते घेऊन जा’ असे पाटील यांना कळवले आणि ते पाटील यांना सुपुर्द केले.