पुणे – नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय वीरगाथा स्पर्धेत ६ पारितोषिके व कला उत्सव स्पर्धेत ५ पारितोषिके अशी ११ पारितोषिके मिळवून महाराष्ट्र संघाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात माजी सहसंचालक रमाकांत काठमोरे, विद्यमान सहसंचालक डॉ.शोभा खंदारे, माजी उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे, विद्यमान उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, कला व क्रीडा विभागाचे विभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता डॉ.ज्योती राजपूत, संघप्रिया वाघमारे, विषय सहाय्यक पद्मजा लामरुड आदीनी स्पर्धांच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
कला उत्सव स्पर्धा अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय गायन, पारंपारिक लोकसंगीत गायन, स्वर वाद्य वादन, ताल वाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, चित्र, शिल्प, खेळणी तयार करणे, नाट्य भूमिका अभिनय या कलाप्रकारासाठी जिल्हास्तर ते राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वीरगाथा स्पर्धा देशभरातील सर्व २८ राज्यातील व ६ केंद्रशासित प्रदेशातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी कार्यान्वित केला गेला.
महाराष्ट्रभरातून शाळापातळी ते जिल्हापातळीवर ३ लाख ६० ह्जार प्रवेशिका आल्या होत्या. राज्य स्तरावरील मूल्यमापनासाठी ३ ह्जार ९०० प्रवेशिका सादर करण्यात आल्या. राज्यातून रुब्रीक्स मूल्यमापन पद्धतीनुसार मूल्यांकन करून, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्यातील सहभागी प्रवेशिकापैकी उत्कृष्ट अशा ४०२ प्रवेशिका पाठवण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचे स्पर्धांच्या निकालात यश
शास्त्रीय गायन – युगंधरा केचे (द्वितीय), अर्णव बुवा (द्वितीय), शास्त्रीय वादन – राधिका सुवर्णकार (बासरी – प्रथम), लोकवाद्य – राहुल गेजगे (द्वितीय), शास्त्रीय वादन – प्रथमेश शहाणे (द्वितीय),
वीर गाथा स्पर्धा – झेबा सत्तार शेख (मुंबई), गौरी उगले (अहमदनगर), कृषीता पाटले (धुळे), अंजली मीना (जळगाव), हितेश कुमकर (ठाणे), आयेशा तिसेकर (रत्नागिरी).