Sanjay Raut – शंकराचार्यांनी हिंदु धर्मासाठी स्वताचे काय योगदान दिले असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. काल येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की शंकराचार्यांनी टीका करण्याऐवजी राम मंदिराला आशीर्वाद दिले पाहिजेत, शंकरार्चाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडे “राजकीय दृष्टीकोनातून” टीका करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ते म्हणाले की अयोध्येतील मंदिरासाठी आतापर्यंत कोणी ही काही करू शकले नाही. मोदी, भाजपने ते हाती घेतले आणि मंदिर बांधले जात आहे. शंकराचार्यांनी मंदिराला आशीर्वाद द्यायचा की त्यावर टीका करायची? हे मंदिर आहे. राजकारणावर नाही तर धर्मावर ते बांधले गेले आहे. राम आमचा देव आहे, असे राणे म्हणाले. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचे काय योगदान आहे ते सांगावे, असेही ते म्हणाले.
नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपने समस्त हिंदूंची माफी मागावी… असं संजय राऊत म्हणाले आहे. यावेळी ते माध्यमांशी सवांद साधत होते. संजय राऊत म्हणाले की, “केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात शंकराचार्यांना काय कळते? मात्र देशातील चार पिठाच्या शंकराचार्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली.
मंदिर अर्धवट असताना प्राणप्रतिष्ठा योग्य नाही असे ते म्हटले होते. ते शास्त्र, वेद, पुराण यातील तज्ज्ञ आहेत. मात्र भाजपच्या मंत्र्यांनी केवळ शंकराचार्यांचाच नव्हे तर संपूर्ण हिंदूंचा अपमान केला आहे. राणेंचे हे विधान हिंदूंच्या भावना दुखावणारे होते. याप्रकरणी 22 जानेवारीपूर्वी भाजपने हिंदूंची माफी मागावी, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.