महसूल खात्याबरोबर पोलीस, ग्रामविकास, शिक्षण आणि क्रीडा विभागात सर्वाधिक प्रकरणे
रांजणी – शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची पैसे घेतल्याशिवाय काम न करण्याची मानसिकता ही संपूर्ण देशात आहे; परंतु असे असले तरी लाच घेणारे आणि लाचखोरी करणारे सर्वात जास्त अधिकारी आणि कर्मचारी वर्ग महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. लाचखोरीमध्ये देशात महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याचे चित्र दिसून येते.
क्राइम रिपोर्ट ब्युरोचा देशाच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. त्यामध्ये लाचखोरीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे दिसून आले. शासकीय कार्यालयात अडलेली कामे तडीस लावण्यासाठी त्याचबरोबर शासकीय अनुदान मंजूर होण्यासाठी पोलिसांनी तपासात सहकार्य करावे, गुन्ह्यातून नाव वगळावे. 7/12वर नाव लवकरात लवकर लागावे. खरेदी, विक्रीची नोंद करणे अशा अनेक कारणांनी शासकीय कार्यालयात लाच घेतल्याशिवाय अधिकारी वर्ग काम करत नाही. अशा लाचखोरींची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते.
महाराष्ट्रात लाचखोरीच्या बाबतीत महसूल खात्याबरोबर पोलीस, ग्रामविकास शिक्षण आणि क्रीडा विभागात सर्वाधिक लाच घेतल्याचे उघड झाले आहे. पुणे जिल्ह्याच्या बाबतीत लाचखोरीचा विचार केला तर महसूल आणि ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे मोठ्या प्रमाणात लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येते.
गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात सुमारे दीडशेहून अधिक महसूल आणि ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करत असलेले अधिकारी लाचखोरीत पकडण्यात आले आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात लाच घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
एकूणच लाचखोरीचा विचार केला तर कर्मचाऱ्यांना लाच घेण्याची सवय ज्याचे काम करायचे आहे अशीच व्यक्ती लावते. मात्र त्यासाठी लाच देणाऱ्याने पुढाकार घेऊन एखाद्या अधिकाऱ्याने लाच मागितली तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळवून त्यासंदर्भातील योग्य ती माहिती दिली तर लाचखोरीला आळा बसेल.
-नितीन मिंडे, पुणे जिल्हा ग्राहक संघटना उर्जा समिती प्रमुख