मुंबई – संगीत रंगभूमी गाजवणाऱ्या ‘कीर्ती शिलेदार’ कालवश झाल्या. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.
संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. अश्या ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार आज (दि. २२) आपल्यातून निघून गेल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या संदर्भातील एक पोस्ट मुख्यमंत्र्यांनी शेअर केली आहे.
“मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांना जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली.
त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. त्यांचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल..!’ असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.