सातारा – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सातारा जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त सहकार्याने दीर्घ काळानंतर साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगणार आहे. कुस्ती शौकिनांना या कुस्त्यांचा थरार मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ अशा दोन सत्रांमध्ये तीन गादीच्या व दोन मातीच्या अशा एकूण पाच आखाड्यांमध्ये या कुस्त्या रंगणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे समन्वयक ललित लांडगे व जिल्हा तालीम संघाचे निमंत्रक दीपक पवार व समन्वयक सुधीर पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दीपक पवार म्हणाले, “”या स्पर्धेचे साताऱ्याला यजमान पद देण्याचे श्रेय हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांचे आहे. महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा साताऱ्यात व्हावी यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नशील होतो. तब्बल 61 वर्षांनी यंदा तो मान साताऱ्याला मिळाला आहे,” तालीम संघाने या स्पर्धेचे कल्पक नियोजन केले असून या संपूर्ण पाच दिवसांच्या कार्यक्रमाचा खर्च तीन कोटी रुपये आहे. सातारा शहरातील दानशूर संस्था तसेच जिल्हा तालीम संघाचे हितचिंतक व संचालकांनी हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे, असे त्यांनी सांगितले.
मंगळवारी दि. 5 रोजी सकाळी नऊ वाजता सर्व पंचांचे आगमन, सकाळी साडेनऊ ते अकरा पंचांचा उजळणी वर्ग, दुपारी बारा वाजेपर्यंत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 45 संघांचे आगमन आणि नोंदणी, दुपारी 12 ते 2 कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये 57 किलो, 70 किलो, 92 किलो गटांतील पैलवानांचा समावेश आहे. सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत वरील तिन्ही वजनी गटातील मल्लांच्या
कुस्ती स्पर्धा दोन मातीच्या तर तीन गादी आखाड्यावर होणार आहेत, अशी माहिती ललित लांडगे यांनी दिली. पहिल्या सत्रातील कुस्ती स्पर्धा या सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत होणार आहेत. 900 मल्ल, 110 प्रशिक्षक पंच आणि साडेपाचशे पोलीस अशा सर्व लवाजम्याची भोजनाची सोय करण्यात आली असून सर्व पाहुण्यांची व्यवस्था सातारा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शाहू स्टेडियमच्या संकुलामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. दररोज विविध गटांमध्ये प्रत्येकी तीन अशा एकूण 18 कुस्त्या रंगणार असून त्यांच्या प्राथमिक, उपांत्य अशा दोन फेऱ्या होणार आहेत. छत्रपती शाहू क्रीडा संकुलाला तब्बल साडेपाचशे पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान अमोल बुचडे उपस्थित होते.
अंतिम फेरी रंगणार शनिवारी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपांत्य व अंतिम फेरीचे 70, 92 आणि 125 किलो वजनी गटातील थरारक सामने 8 व 9 एप्रिल रोजी रंगणार आहेत. या सामन्यांना अधिकाधिक गर्दी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्टेडियम क्षमता 55,000 आहे. स्पर्धेचा अंतिम थरारक सामना दि. 9 रोजी होत असून मानाची चांदीची गदा देण्याकरिता ज्येष्ठ नेते शरद पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.