बीड – बीडचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे हे आपल्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू होती. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षावर नाराज नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. बजरंग सोनवणे म्हणाले की, माझ्यावर चंदन चोर हा लागलेला कलंक असून बायको सुद्धा मला कधी कधी म्हणते की, आपल्याला चंदन चोर का म्हणतात? तर राजकीय लोक माझ्यावर हे आरोप करत असतात. असे सोनवणे म्हणाले.
अनेक राजकारणी चंदन चोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सोनवणे यांनी मिश्किलपणे सांगितले की, माझी बायको पण कधी कधी मला म्हणते की आपल्याला लोक चंदन चोर का म्हणतात? मात्र राजकारणामध्ये आरोप करणारे लोक आरोप करतात. चंदनचोर हा माझ्यावर लागलेला कलंक आहे, मी गुत्तेदार नसून शेवटचा श्वासापर्यंत राष्ट्रवादीसाठी काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.
शरद पवार यांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपंचायत निवडणुकीत आपल्या मुलीचा पराभव झाला. हे जिव्हारी लागले असले तरी विजयाचा आणि पराजयाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी यासाठी पक्षाला जबाबदार धरणार नाही. धनंजय मुंडे, अजित पवार हे माझे नेते आहेत त्यामुळे मी कोणावरही नाराज नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले आहे.
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काही दिवसापूर्वी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली होती आणि तेव्हापासूनच माजी अध्यक्ष बजरंग सोनवणे काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आज बजरंग सोनवणे यांनी बीड शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपले मौन सोडले आहे. केज नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचे शल्य आहे. पण माझी भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार आहे. कार्यकर्त्यांना समजावून सांगू कार्यकर्त्यांचा निश्चितपणे गैरसमज दूर करू, असे सुद्धा यावेळी बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.