सातारा – नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी बनला आहे. कोल्हापूरला तब्बल 21 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी मिळाला आहे. महाराष्ट्र केसरी मिळूनही पृथ्वीराज नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर अद्याप बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची खंत विजेत्या पृथ्वीराजने व्यक्त केली आहे.
साताऱ्यात काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामाना पार पडला. या महाअंतिम सामन्यात कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकरला अस्मान दाखवत मानाची गदा मिळवली आहे. कोल्हापूरचा पठ्ठ्या पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरीचा विजेता झाला. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे. अंतिम सामन्यात विशाल बनकरवर त्यानं 5-4 नं मात केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी एकच जल्लोष केला. पण अद्याप बक्षीसाची रक्कम मिळाली नसल्याने व्यथीत झालेल्या पृथ्वीराजने अखेर सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली आहे.
पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस देणे गरजेचे आहे, जर हे दिले गेले नसेल तर नक्कीच बक्षीस का दिले गेले नाही याची माहिती घेतली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे. कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातुन येतात यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली गेली पाहिजे असे मत जागतीक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या सोनबा गोंगाने याने सुद्धा व्यक्त केले आहे.