मुंबई – राज्यात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. आज तब्बल 25833 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव रूग्णांची संख्या आता 1 लाख 66 हजार 353 वर जाऊन पोहोचली आहे.
राज्यातील दोन दिवसांतील आकडे चिंता वाढवणारे आहेत. राज्यात बुधवारी 23 हजार 179 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आजही रुग्णवाढीचा आकडा वाढताच आहे. गेल्या 24 तासात करोनाचे तब्बल 25 हजार 833 रुग्ण वाढले आहेत. तर करोनामुळे आज 58 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आज राज्यात 12 हजार 174 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.22 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 21 लाख 75 हजार 565 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.79 टक्के एवढे झाले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज (ता.18) मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा भाविकांसाठी बंद असणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाणे सकाळी सात ते सायंकाळी 5 या वेळेतच सुरू राहणार आहेत.