मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत आज त्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खाते वाटपाच्या चर्चेसाठी अजित पवार दिल्लीला जात असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई विमानतळावरून ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचे सत्र सुरु आहे. मात्र खातेवाटपावर मार्ग निघत नसल्यामुळे आता भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर याबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस काही खात्यांसाठी आग्रही आहे. पण शिवसेनेच्या आमदारांचा त्याला विरोध आहे. अजित पवार यांना अर्थखाते हवे आहे. त्यासाठी ते आग्रही आहेत. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार यांना अर्थखाते असताना त्यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव केला गेला होता, असा आरोप शिवसेना आमदारांचा आहे. त्यामुळे याबाबतचा तिढा निर्माण झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला मोठा भूकंप झाला. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.
भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट यांना आता कोणाला किती मंत्रिपदे मिळणार हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होत आहे. त्याआधिच मंत्रिपद खातेवाटप होणार असल्याचे बोलले जात आहे.