मुंबई – मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तिन्ही नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाईल अशी माहिती दिली.
मंत्रिपदांवरून सध्या सत्तारूढ आघाडीत धूसफूस सुरू आहे. अजित पवार गटाच्या मंत्र्यांना एकदम नऊ कॅबिनेट मंत्रीपदे दिली गेली पण शिंदे गटातील लोकांना संधी दिली गेली नाही, तसेच भाजप मधीलही लोकांना या बाबतीत तिष्ठत ठेवले गेले आहे, त्यामुळे निर्माण झालेली धूसफूस दूर करण्यासाठी विस्ताराचा कार्यक्रम लवकरच केला जाणार आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असे जे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे त्यावरून सध्या जे वादंग माजले आहे त्या विषयी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना त्यांची प्रतिक्रीया विचारली असता शिंदे म्हणाले की, ठाकरे यांनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीशी तडजोड केल्याने त्यांचा बोलण्याचा अधिकार गमावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टिप्पणी निषेधार्ह आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे?असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.