औरंगाबाद – महाराष्ट्रातील आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजनेचे काम थांबवल्यानेच मराठवाड्यात सध्या पूरस्थिती उद्भवली आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढवली आहे. या पुरस्थितीची पहाणी केल्यानंतर फडणवीस यांनी हा आरोप केला.
फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील इरला आणि दौतपुर गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. फडणवीस यांनी हा आरोप केला असला तरी पर्यावरण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे की, भाजप सरकारच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार योजनेत झालेली कामे अशास्त्रीय पद्धतीने झाली आहेत त्यामुळेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती उदभवली आहे.
फडणवीस यांनी म्हटले आहे की, नद्यांचे खोलीकरण आणि रूंदीकरण करून अनेक ठिकाणी साठणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करता आले असते, पण राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही योजनाच थांबवल्याने नद्यांच्या रूंदीकरण आणि खोलीकरणाचे काम थांबले आणि त्यातून ही पूरस्थिती उद्भवली आहे. पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना दसऱ्यापुर्वी थेट बॅंक खात्यात राज्य सरकारने मदत पोहचवली पाहिजे अशी मागणीही फडणवीस यांनी केली.