पुणे- अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यातही महाराष्ट्राने देशभरात अव्वल क्रमांक पटकवला आहे. सध्या 579 प्रकल्पांना बॅंकांकडून कर्ज मंजूर झाले आहेत. तर 1,521 प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत ही माहिती समोर आली आहे.
अन्न प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराची उत्तम संधी आहे, असे कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक डॉ. सुभाष नागरे यांनी सांगितले. या योजनेमुळे नाशवंत शेतमालाची थेट विक्री होऊन शेतकऱ्यांना उत्पन्नहमी मिळेल. त्यातून काही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही टाळता येईल.
अशी आहे योजना
अन्न प्रक्रिया उद्योगाकडे नवउद्योगांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना आहे. लाभार्थींना प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान दिले जाते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकाराचा वाटा 60:40 इतका असेल. यात लाभार्थीला मोफत प्रशिक्षण दिले जाते.
पुण्यातून टोमॅटोची निवड
योजनेसाठी केंद्र सरकारने “एक जिल्हा एक उत्पादन’ असे धोरण ठरवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारसीनुसार शेतमालाची निवड होते. पुणे जिल्ह्यात टोमॅटो या पिकाची निवड करण्यात आली आहे. यासाठी 372 उद्योजकांनी अर्ज केले. त्यातील 36 प्रकरणांना मंजुरी मिळाली, तर 75 प्रकरणे प्रतीक्षेत आहेत.
बेरोजगार तरुण आणि नवउद्योगांना ही एक उत्तम संधी आहे. ज्यांचे शिक्षण आठवी झाले आहे, असे तरुणही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा फायदा जास्तीच जास्त शेतकऱ्यांना होणार आहे.
– डॉ. सुभाष नागरे, संचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन विभाग
राज्यनिहाय मंजूर अर्ज
महाराष्ट्र- 579
आंध्रप्रदेश- 321
कर्नाटक-295
मध्यप्रदेश-292
उत्तरप्रदेश – 229