प्रा. नितीन मटकरी
गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी दिलेल्या आध्यात्मिक शिकवणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा, याची शिकवण दिली. तत्पूर्वी समर्थांनी ही शिकवण देताना म्हटले आहे की-
आधी करावा प्रपंच नेटका ।
मागची साधावे परमार्थे विवेका ।।
प्रपंच हा “करायचा’ आहे, तर परमार्थात “साधायचे’ आहे. हा मोठा व फारच महत्त्वाचा मूलभूत फरक प्रपंच आणि परमार्थ यात आहे. म्हणून प्रपंच करताना मनुष्याकडून नित्य, नैमित्तिक या सोबतच अनेक सकाम कर्मही होणे अपेक्षितच असते. या कर्माच्या प्रभावामुळे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांनी पडणारे वळण हे मानवाला देहबुद्धीच्या आहारी नेऊ शकते व वृत्ती समाधानी असेलच असे नाही म्हणून
पारमार्थिक मार्गाने जाणारी साधना हाच यावर उपाय होऊ शकतो. यासाठी गोंधवलेकर श्री महाराजांनी श्रीराम जय राम जय जय राम या तेरा अक्षरी मंत्राची नामसाधना सांगितली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात म्हटलेच आहे-
सर्वांघटीं राम देहदेही एक।
सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी ।।
सर्वांच्या कल्याणासाठी रामाचे नाम आणि त्यायोगे होणारी नाम साधना हाच मार्ग श्री महाराजांनी सांगितला. नामाच्या या उपासनेला स्थळ, काळ यांसोबतच कुठलेही इतर बंधनं त्यांनी सांगितले नाही. प्रपंचात राहून ही उपासना करावी. जेणेकरून प्रापंचिक क्लेश, सुख-दुःख या
सर्वांना सामोरे जाताना मानसिक बळ सोबत असेल, नामजपाची गोडी लागावी यासाठी सुरुवात करताना कितीही अडचणी आल्या तरी दृढतेने व सातत्याने नाम घेणे सुरू ठेवावे. नंतर हळूहळू या सर्व अडचणी दूर होतील हा विश्वास त्यांनी साधकांमध्ये निर्माण केला. माऊलींच्या हरिपाठात प्रमाणाची प्रचिती त्यांनी दिली
नामामृत गोडी वैष्णवा लागली ।
योगिया साधली जीवन कळा ।।
जो नाम घेईल त्याचे मागे राम उभा आहे, नाम घेणाऱ्यांचे राम कल्याण करतो, असा दृढ आशावाद त्यांनी साधकांना दिला. प्रापंचिक जीवनात मिळणाऱ्या यशाने समाधान मिळतेच असे नाही. त्यासाठी समाधानी वृत्ती निर्माण करावी लागेल. केलेल्या कष्टाचे सार्थक व्हावे यासाठी उपासनेने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी.
भगवंताच्या प्राप्तीसाठी नामस्मरण, उपासना हीच उपयोगी आहे. त्यासाठी कसलीही अट नाही. बंधन नाही. नामसाधनेतून भगवंताचे चिंतन घडते व चिंतनातून भगवंताशी अनुसंधान साधले जाते. हे अनुसंधान पक्के झाले की भगवंताचे दर्शन घडते व भगवंत हृदयात नांदतो हे श्री महाराजांच्या उपदेशाचे सार आहे.
मुखी भगवंताचे नाम ।
हाती प्रपंचाचे काम ऐसा जोडा मनी राम ।।
हे श्री महाराजांचे बोध वचन आहे. या सोबतच जगाची आस सोडल्या खेरीज भगवंताचे दास होता येत नाही. दृश्यांमधला देव पाहायचा तर आई वडील हेच आहेत, अशी बोधप्रद बोधवचने श्री महाराजांनी दिली.