मुंबई -गेल्या काही महिन्यात देशपातळीवर घरांची मागणी वाढली आहे. ती दीर्घकाळ टिकणारी आहे. केवळ गेल्या वर्षी तुंबलेल्या मागणीमुळे आता मागणी वाढली आहे, आशातला हा प्रकार नाही असे जेष्ठ बॅंकर दीपक पारेख यांना वाटते.
ही मागणी दीर्घकाळ टिकणारी आहे, याची कारणमीमांसा करताना त्यांनी सांगितले की, एक तर व्याजदर तुलनेने कमी आहेत, घरांच्या किमती स्थिर आहेत, त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडून घरासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे आगामी काळातही परिस्थिती आशादायक राहील असे समजण्यास वाव आहे.
ते म्हणाले की, या मागणीचे विश्लेषण केले असता असे आढळून आले की, सध्याच्या मागणीमध्ये पहिल्यांदा घर घेणारे, छोट्या घरातून मोठ्या घरात जाणारे किंवा अतिरिक्त घर घेणारे अशी सर्वांची संख्या नजरेत भरण्यासारखी आहे. वर्क फॉम होममुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर थोडे मोठे असावे असे वाटत आहे. आणि ते तसे घर मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरील विकास दर सरलेल्या वर्षात कोसळला आहे. हा विकास दर पूर्ववत करण्यासाठी पायाभूत क्षेत्रात आणि घरबांधणी क्षेत्रात बरीच गुंतवणूक अपेक्षित आहे. कारण त्यामुळे महागाई न वाढता रोजगार वाढतो आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते.
सरकारही पायाभूत क्षेत्रात बरीच गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे सरकारने व्यावसायिक आणि निवासी घरबांधणी प्रकल्पाना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्याचालना देण्याची गरज आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला हे क्षेत्र चांगला आधार देऊ शकेल. याबाबत केंद्र आणि राज्याने सर्वसमावेशक विचार करण्याची गरज आहे. या क्षेत्राच्या दीर्घ पल्ल्याच्या विकासासाठी विविध मागण्या गांभीर्याने पूर्ण करण्याची गरज आहे,असे पारेख यांनी सांगितले.
घरांची वाढीव मागणी कायम राहणार!