पिंपरी (प्रतिनिधी) -रत्नागिरी, देवगड हापुस आंब्याची सध्या पिंपरी बाजारपेठेत कमी आवक होत आहे. तसेच, डझनाचा भाव 900 ते 1600 रुपयांपर्यंत चढे आहेत. त्यामुळे मागणी कमी आहे. गुढीपाडव्यानंतर आंब्याचे दर उतरतील. तसेच, आवकही वाढेल, असा फळ विक्रेत्यांचा अंदाज आहे.
पिंपरी येथील फळ बाजारात सध्या आंब्याच्या पेट्यांची दहा टक्क्यांपेक्षाही कमी आवक झाली आहे. आवक कमी असल्याने दर चढे आहेत. सध्या पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही अपेक्षित आवक होत नाही. त्यामुळे फळ विक्रेत्यांना वाशी (मुंबई) येथुन हापुस मागवावा लागत आहे. सध्या देवगड हापुस 900 ते 1400 रुपये डझन या दराने मिळत आहे. तर, रत्नागिरी हापूस 1200 ते 1600 रुपये डझन या दराने दिला जात आहे.
हापूसचे दर जास्त असल्याने सध्या मागणी कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, ज्यांना आवड आहे ते आवर्जून हापुसची खरेदी करीत आहेत. आंब्याच्या 1, 2, 5 आणि 6 डझनात पेट्या उपलब्ध आहेत. सध्या 10 टक्क्यांपर्यंतही आवक झालेली नाही. गुढीपाडव्यानंतर मालाची आवक वाढेल. त्यामुळे दरही उतरतील, अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करीत आहेत. कर्नाटक हापुसचे दर तुलनेत कमी आहेत. हा हापुस 500 रुपये डझन या दराने मिळत आहे. मात्र, त्याला मागणी कमी आहे, अशी माहिती फळ विक्रेते कुमार शिरसाट यांनी दिली.
बदाम, लालबागचे दरही शंभरच्या पुढे
बदाम आंबा सध्या 100 ते 160 रुपये किलो या दराने विकला जात आहे. तर, लालबाग आंबा 120 ते 200 रुपये या दराने मिळत आहे. हापुसचे दर जास्त असल्याने सध्या या आंब्यांनाच चांगली मागणी आहे. तसेच, त्यांची आवकही 10 ते 15 टक्क्यांपर्यंत आहे.