- ‘ऱिफंड’साठी दीड महिना ‘वेटिंग’
– प्रकाश गायकर
पिंपरी – करोना विषाणूच्या संक्रमणामुळे शाळा आणि अनेक कंपन्या अद्याप बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे इंटरनेट कनेक्शनला मागणी वाढली आहे. मात्र इंटरनेट पुरविणाऱ्या कंपन्यांकडून नागरिकांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. कनेक्शनपूर्वी नागरिकांकडून कंपनीच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सांगून त्यानंतर नेट कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची अर्थिक लूट होत आहे. अनेक नागरिक आरोप करत आहेत, की कंपन्यांना इंटरनेट कनेक्शन देण्याची इच्छाच नाही ते केवळ दीड महिना ग्राहकांचे पैसे वापरुन घेत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मार्च महिन्यामध्ये करोनाचे रुग्ण आढळले. त्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. तसेच लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांच्या कामगारांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय खुला करण्यात आला. मोबाइलवरील इंटरनेटच्या माध्यमातून यामध्ये अनेक अडथळे येतात. त्यामुळे अनेकांनी ब्रॉडब्रॅण्ड इंटरनेटचे कनेक्शन घेणे पसंद केले. मात्र या चार महिन्यांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट करण्यात आली.
नेटसाठी ग्राहकांनी बुकींग केल्यानंतर त्यांना तात्काळ ऑनलाइन पैसे भरण्यास सांगण्यात येते. त्यानंतर कागदपत्रांची कारणे सांगत नेट कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे ग्राहक कंटाळून कनेक्शन नको असल्याचे सांगतात. त्यामध्ये कंपनी ग्राहकांना रिफंडचा पर्याय देत असली तरी त्यासाठी तब्बल 45 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जाते. तसेच किचकट प्रक्रियेलाही सामोरे जावे लागते.
राऊटरचे कारण देत दुप्पट भुर्दंड
कनेक्शन घेण्यापूर्वी कंपनीच्या माणसांकडून दोन दिवसांत कनेक्शन देण्याचे कबूल केले जाते. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी राऊटरचा स्टॉक शिल्लक नाही तुम्ही बिनाराऊटरचे नेट बसवून घ्या, असे सांगितले जाते. ज्या ग्राहकांना शक्य आहे ते ग्राहक अशावेळी इंटरनेट बसवून घेतात. त्यामध्ये राऊटर न देता नेट दिल्याने कंपनीला फायदा होतो. तर दुसरीकडे ग्राहकांना स्वतःला राऊटर घेण्यास सांगितले जाते. त्यामध्ये राऊटरचे पैसे वजा करून ग्राहकांना नेटचा बॅलन्स दिला जातो. मात्र बाहेर राऊटरची किंमत 1200 रुपये आहे. एक महिन्याचे नेट वाढवून दिल्यावर कंपनीचे 600 रुपये खर्च होतात. म्हणजेच कंपनीला एका ग्राहाकापाठीमागे 600 रुपयांचा अतिरिक्त नफा होतो. मात्र ग्राहकांना बोलण्यात फसवून त्यांची लूट केली जाते.
आम्ही इंटरनेटसाठी तिकोणा कंपनीच्या माणसाला घऱी बोलवले होते. स्वतःचे एस आर इन्टरप्रायजेस असलेल्या माणसांने घराची पाहणी केली. त्यांनी तुम्हाला दोन दिवसांत नेटचे कनेक्शन देतो असे सांगितले. त्यानंतर आम्ही त्यांना सर्व कागदपत्रे दिली. त्यांनी आयडी केल्यानंतर आम्ही लगेचच 4713 रुपये त्यांनी दिलेल्या लिंकवर पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या घरी नेट बसवून देण्याची आमची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. पाच दिवसांमध्ये तीनवेळा माणसे घरी आली. एकाच कंपनीची माणसे असतानाही त्या तिघांचेही कनेक्शनबाबत मते वेगळी होती. त्यानी सांगितल्यावर आम्ही त्यांना राऊटरही घेऊन दिला. मात्र त्यांनी नंतर आम्हाला कनेक्शन रद्द करायला सांगितले.
– मारूती राघोजी, पिंपळे गुरवपैसे परत द्यायला एवढा वेळ लागत असेल तर त्यांनी ग्राहकांना पहिल्यांदा ही गोष्ट सांगणे आवश्यक आहे. दीड महिना हा खूप मोठा कालावधी आहे. कंपनीने ग्राहकांच्या पैशांचे व्याज द्यावे.
– रमेश सरदेसाई, अध्यक्ष पिंपरी चिंचवड ग्राहक मंच
—
कंपनीची प्रोसेस आहे. त्यानुसार आम्हाला नियम पाळावे लागतात. कंपनीने ग्राहकांना पैसे परत देण्यासाठी जास्तीत जास्त 45 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यापूर्वी आम्ही ग्राहकांना पैसे देण्याची व्यवस्था करतो.
– संतोष यादव, मॅनेजर तिकोणा ब्रॉडब्रॅण्ड सर्व्हिस