कोळकी (वार्ताहर) – करोना संकटामुळे अडीच महिन्यांपासून बंद असलेली एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. दोन-अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी फलटण आगारातून सातारा, लोणंद आणि आसू मार्गावर एसटी बस धावली. दरम्यान, दहिवडी मार्गावरही एसटीसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगतानाच करोनामुळे पुरेसे प्रवासी नसल्याने एसटीसेवा तोट्यात सुरु असल्याचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी सांगितले.
करोनामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करुन उद्योग व्यवसायांसह प्रवासी वाहतूक देखील नियम व अटींच्या शर्थींवर सुरु करण्यात आली. सरकारकडून एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही गेल्या दोन अडीच महिन्यांपासून उभ्या असलेल्या एसटी बसेस आता धावताना दिसत आहेत. शनिवार फलटण आगारातूनही सातारा, लोणंद आणि आसू मार्गावर एसटीसेवा सुरु करण्यात आली. करोनामुळे सध्या प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने एसटी तोट्यात असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अद्याप जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली नसल्याने पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, सांगली मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरु करता आली नाही. एस. टी. माध्यमातून माल वाहतूक करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी वेगळ्या प्रकारची वाहने महामंडळाने उपलब्ध करुन दिली असून सातारा येथून माल वाहतूक सुरु झाली आहे. लवकरच फलटण आगारातूनही माल वाहतूक सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे कुंभार यांनी निदर्शनास आणून दिले.