पाबळ – तीन महिन्यांपासून करोनाने शिरूर तालुक्यात विळखा घट्ट केला आहे. शहरातून आलेल्या काही चाकरमान्यांमुळे पुन्हा सर्वसामान्य कुटुंबे भरडून निघत आहेत. शहरातून आलेल्या कुटुंबांमुळे गावाकडील सगे, सोयऱ्यांना तपासणीसाठी सामोरे जावे लागत आहे. शासकीय तपासणीच्या दिव्यातून जाण्यासाठी अनेक कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयात उपचारासाठी न गेलेला रुग्ण खासगी रुग्णालयात गेला होता. त्याची चाचणी पॉझिटिव्ह जाहीर केल्यानंतर त्या व्यक्तीचा ताबा आरोग्य अधिकारी, कर्मचारी घेतात, त्याला आणि नातेवाइकांना पुन्हा सरकारी टेस्ट, तपासणी, रिपोर्ट, क्वारंटाइन, दैनंदिन नोंदी, चौदा दिवसांनंतर करोनामुक्तीचे प्रशस्तीपत्रक या शासकीय प्रक्रियेतून जावे लागत आहे.
यात भीतीची छटा, तणावाखाली भरडली जाणारी कुटुंबे, सामाजिक प्रतिष्ठेबाबतीत अवहेलना, घरातील सदस्यांचा तिरस्कार हे घटक कारणीभूत ठरत आहेत. हीच बाब मरणयातना देणाऱ्या ठरत आहे. अशा घटना शिरूर तालुक्यात घडल्या आहेत.
गावगाड्यात भयानकता
शहरी भागात सर्व सुविधायुक्त रुग्णालये आहेत. वेळप्रसंगी वाटेल तितकी किंमत मोजून उपचार करून घेणारे नागरिकही आहेत. यामागे करोनाबाबत समाजमाध्यमातून उलट सुलट मिळणारी माहितीही कारणीभूत ठरली आहे. मात्र, ग्रामीण भागात करोना म्हणजे मरण, ही वस्तुस्थिती दशहत निर्माण करणारी ठरली आहे. एखाद्या गावातील बातमी आली की, नागरिकांनी घराबाहेर पडणेच थांबवावे, इतकी भयानकता यामागे पुढे येत आहे. यासाठी करोनाविषयी मूळ असलेली भीती दूर करण्याची प्राथमिकता शासनाकडून करण्याची आवश्यकता आहे.