वाल्हे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून वाल्हे गाव तसेच गावाजवळील १२ वाड्या -वस्ती रविवारी दि. १२ एप्रिल पासून ते १४ एप्रिल पर्यंत असे तीन दिवस पुर्ण बंद राहाणार आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला पुणे जिल्हा बॅकेच माजी अध्यक्ष प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे, सचिन लंबाते, दत्तात्रय पवार, उषा पवार, तलाठी निलेश पाटील, पोलिस हवालदार हनुमंत गार्डी, धनंजय पवार, सागर भुजबळ, अमोल भुजबळ, सचिन जाधव उपस्थित होते. वाल्हे (ता.पुरंदर) गावामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दि.१२ एप्रिल पासून ते १४ एप्रिल पर्यंत १०० टक्के गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले. वाल्हे ग्रामपंचायत व व्यापारीवर्ग,तसेच ग्रामस्थांनी १४ एप्रिलपर्यंत गावबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
बंदच्या काळात गावातील सरकारी व खासगी दवाखाने, मेडिकल्स वगळून सर्व दुकाने १०० टक्के दुकाने बंद असणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या व सामाजिक आरोग्यास बाधा पोहोचविणाऱ्या व्यक्तीवर संचारबंदी व जमावबंदी कायद्यानुसार व नोटीसाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करणार असल्याचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, व ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी सांगितले.
दरम्यान, वाल्हे पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार हनुमंत गार्डी यांनी भेट देऊन ग्रामस्थांना संचारबंदीबाबत कडक सूचना देऊन नियम मोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले.