मुंबई – राज्यातील लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्यात आले असून त्यात आणखीन शिथिलता देण्यात आली आहे. याबाबतची नवीन नियमावली सरकारने आज जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच खासगी कार्यालयने आणि दुकाने उघडण्यासही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याअंतर्गत वाहतूक बंदी केली होती. यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रातही कामानिमित्त प्रवास करणे शक्य नव्हते. यामुळे राज्य सरकारने नियमात बदल केला असून एमएमआरडीए क्षेत्रात वाहतूक परवानगी दिली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे.
याशिवाय आऊटडोर फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे घराबाहेर व्यायाम करायला गेलात तर तुम्हाला ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने एकाच दिवशी उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ऑड आणि इव्हन या नियमाप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नवीन नियमावली
1) बाहेर व्यायाम करण्याची परवानगी. मात्र व्यायामाचे कोणतेही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.
2) दुकान सम-विषय नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने सुरु राहतील. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सूचना.
3) खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी किंवा 10 कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकतात. इतर कर्मचाऱ्यांना घरुन काम करावे लागेल. यावेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा. हा निर्णय 8 जून 2020 पासून लागू होईल.
4) रविवारपासून म्हणजेच 7 जून 2020 पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
5) शैक्षणिक संस्थांचे (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात.
6) मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी आता पासची गरज नसून कोणतेही निर्बंध नसणार आहेत. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांवर नियमितपणे लक्ष ठेवले जाणार आहे. अडकलेले मजूर, स्थलांतरित कामगार, पर्यटक यांच्या प्रवासावर आधीच्या नियमांप्रमाणे नियंत्रण असणार आहे.