नवी दिल्ली: बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. लॉकडाउन हा काही कोणत्या आरोग्य विषयक समस्येवरील दीर्घकालीन तोडगा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रकारच निरर्थक असून त्यामुळे आर्थिक समस्येवरही कोणता तोडगा निघणार नाही. लॉकडाउनची ही रणनिती म्हणजे समस्येवर उपाय शोधण्याऐवजी नवीन समस्या शोधण्याची रणनिती असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच यामुळे देश अधिकच कमकुवत होईल असेही त्यांनी नमूद केले.
सर्व भारतीय निरक्षर, बेशिस्त आणि अज्ञानी असून त्यांना मेंढ्यांसारखे हाकण्याची गरज असल्याचा कथित युक्तीवाद आपल्याला मान्य नसल्याचे नमूद करत सध्याचा लॉकडाउनचा पर्याय भविष्यात दीर्घकाळ टीकणारा नाही. पुन्हा केव्हा कोणता विषाणू आला तर पुन्हा लॉकडाउनची भिती बाळगायची का, असा सवालही त्यांनी केला.
अलिकडेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चरर्सने अर्थात सीआमने वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना जीएसटीत सूट देण्याची आणि परिचालनासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र या मागण्याही आपल्या अमान्य असल्याचे नमूद करत बजाज म्हणाले की, सरकारने कोणत्याही प्रश्नावर तर्कसंगत तोडगा काढला पाहिजे. लॉकडाउन हा सध्याच्या समस्येवरचा तोडगा नाही. अगोदरच बरेच नुकसान झाले असून आर्थिक चक्र सुरू राहण्यासाठी योग्य ती दक्षता आणि खबरदारी घेत तरूण आणि कोणतेही आजार नसलेल्या लोकांना कामावर जाण्याची परवानगी दिली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आयुर्वेद आणि नचुरोपथीमधील भारताचे प्रभुत्व जगाने मान्य केले असून आयुष मंत्रालयासारखे स्वतंत्र मंत्रालय असताना याचा जास्तीत जास्त लाभ करून घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
सध्याच्या स्थितीत त्यांच्या कंपनीने संशोधन आणि विकास कार्यावर केला जाणारा खर्च पूर्ण बंद केला आहे. तसेच मार्केटींगवर वर्षासाठी 200 कोटी रूपयांची खर्चाची त्यांची तरतूद आहे. जी आता जवळपास शून्य आहे. तसेच गुंतवणुकीच्या सर्व योजनाही वर्षासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.
लॉकडाउनच्या काळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जाणार असल्याचे कंपनीने अगोदरच म्हटले होते. या घटलेल्या वेतनात काम करण्याची कर्मचाऱ्यांची तयारी असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले.