नवी दिल्ली: ईएसआयसी रुग्णालय, हैद्राबाद आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओ ने विकसित केलेल्या मोबाईल जीवरेणूशास्त्र संशोधन आणि तपासणी प्रयोगशाळेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केले.
जैव-सुरक्षा श्रेणी-2 आणि श्रेणी-3 प्रयोगशाळांची स्थापना 15 दिवसांच्या विक्रमी कालवधीत केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी सगळ्यांचे कौतुक केले. या चाचणी सुविधेत दिवसाला 1000 हून अधिक नमुन्यांची चाचणी होऊ शकते ज्यामुळे “कोविड-19′ विरुद्धच्या लढाईतील देशाची क्षमता अधिक वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले. करोना विरुद्धच्या लढाईत आपले सशस्त्र दल विलगीकरण कक्ष उभारणे, आरोग्यसेवा पुरविणे, भारतीय नागरिकांना इतर देशांमधून मायदेशी घेऊन येणे इत्यादी अनेक कामांच्या माध्यमातून आपले योगदान देत आहेत आणि हे प्रयत्न असेच सुरु राहतील, असेही त्यांनी सांगितले.
करोनाची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन आणि विकास कामांना गती देणारी अशाप्रकारची पहिलीच मोबाईल व्हायरल संशोधन प्रयोगशाळा ही “ईएसआयसी’ रुग्णालय, हैद्राबाद यांच्याशी सल्लामसलत करून “डीआरडीओ’ च्या हैद्राबाद येथील संशोधन केंद्रात विकसित करण्यात आली.