डॉ. संतोष काळे
आत्महत्या किंवा नैराश्याने उचललेले टोकाचे पाऊल हा शेवटचा पर्याय असू शकत नाही. सध्याची जीवनशैलीच अशी बनली आहे की, निराशेचे प्रमाण अधिक दिसते. जगात असा कोणताच प्रश्न नसेल की त्याचे उत्तर नाही. उत्तर हेच अंतिम सत्य आहे. ते शोधण्यासाठी हवी सकारात्मकता. सकारात्मक विचार प्रसवण्यासाठी हवे आनंदी मन. त्यामुळे आनंद देणे आणि घेणे या माध्यमातून काही प्रमाणात वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होत राहील.
गेल्या काही वर्षांत देशातच नव्हे तर जगभरात आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. देशात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर थांबण्याचे नावच घेत नाहीयेत. गेल्या 10 महिन्यांत 740 शेतकऱ्यांनी जीव संपवल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीत एका 53 वर्षांच्या लघु उद्योजकाने आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दुसरीकडे देशातील आयआयटीसारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या नावाजलेल्या शिक्षण संस्थांमध्ये गेल्या पाच वर्षांत 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील एका व्यापाऱ्याने नुकसानीमुळे संपूर्ण कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. त्या व्यापाऱ्याला सुमारे दोन कोटींचा फटका बसला होता. त्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते. सामाजिक अपमान आणि नुकसान सहन न झाल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. मात्र अशा प्रकारचा मृत्यू हा खूपच भयानक असतो. स्वत:च स्वत:चे आयुष्य हिरावून घेणे हा खूपच धोकादायक विचार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वर्षात 8 लाख आत्महत्या होतात. एखादा व्यक्ती जेव्हा व्यवस्थेपुढे हतबल होतो, तेव्हा तो अशी टोकाची भूमिका घेतो. समाजात जेव्हा विभक्त कुटुंबाची संख्या वाढली आहे, तेव्हापासून व्यक्ती आत्मकेंद्रित झाला आहे. त्याला आपल्याशिवाय अन्य कोणाच्या दु:ख, त्रासाशी काही देणेघेणे नसते. त्यामुळे शेजारी कोण राहतो, काय करतो, याचा थांगपत्ता लागत नाही. शेजारच्या घरात मोठ्या घटना घडत असतात तेव्हा त्याच्या बाजूला राहणाऱ्याला काहीच समजत नाही. सर्वजण स्वत:मध्ये एवढे गुंतले आहेत की दुसऱ्यांचे सुख, दु:ख जाणून घेणे ही दूरची गोष्ट राहिली आहे.
यापूर्वीही लोक दु:खी, कष्टी असायचे. नाराज असायचे. अनेक प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक ताण सहन करायचे. मात्र तेव्हा व्यक्ती एकटा नसायचा. तो नैराश्येला बळी पडलेला नसायचा. त्याचसमवेत कुटुंब असायचे. त्याचे दु:ख वाटून घेणारी माणसं सोबत असायची. त्याला त्रासातून बाहेर काढणारी लोक होती. एकटेपणा हा निराशेचे मूळ कारण आहे. त्यामुळे तो स्वत:च्या विश्वात वावरत असतो. तो दुसऱ्याला काही सांगत नाही, बोलत नाही, सल्लाही घेत नाही. कालांतराने ही मानसिकता बळावत जाते आणि शेवटी आत्महत्या करतो. आजची स्थिती पाहून लोक आनंदी राहणेच विसरुन गेलेत की काय, असे वाटू लागले आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या अडचणीत असल्याचे दिसून येते.
महानगरातील दु:ख वेगळे आहे. महानगरेही लोकांना मानसिक त्रास देते. बाजाराच्या उद्देशाने लोक गावाकडून शहराकडे गेली. कालांतराने अडचणीत वाढ झाली. अनोळखी शहरात कोणीही ओळखीचा नाही. तरीही पैसे कमावण्यापोटी राहत आहेत. कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा आहे. वाढत्या महानगरांमुळे गावाची संस्कृती संपत चालली आहे. गावाकडे एकमेकांची सुख, दु:खे समजून घेतली जायची. मात्र महानगरात मात्र औपचारिकता असते. अर्थात आत्महत्या हे कोणत्याच समस्येवरचा उपाय नाही. या कृतीने केवळ ती व्यक्ती नाही तर कुटुंबालाही वाऱ्यावर सोडले जाते. त्यांच्या मनात वाढलेली नकारात्मकता ही कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हे सांगता येत नाही.
आत्महत्येची प्रवृत्ती ही लहान मुलांतही वाढत चालली आहे. अभ्यासातील अपयशामुळे ही चिमुकले आत्महत्या करत आहेत. यावरुन समाजातील वेदना, दु:खाचे प्रमाण वाढत चालले की काय, असे वाटू लागले आहे. समाजातील दु:ख हे अनेक रुपातून आपल्या समोर येतात. हे दु:ख एकटेपणाकडे तर कधी निराशेकडे नेते. त्यावर उतारा म्हणून काही जण आत्महत्येचा मार्ग निवडतात. समाज कोणत्या दिशेने जात आहे, हे समजण्यास मार्ग नाही. अपयश हे आत्महत्या करण्याइतपत वाईट नसते. कितीतरी मंडळी अपयशातून यशाचे शिखर गाठतात. मात्र जे या स्थितीतून बाहेर पडत नाहीत, ते स्वत:ला संपवण्याचा विचार करतात.
यावर एकच तोडगा म्हणजे कोणत्याच अडचणी, प्रश्न मनात न ठेवणे. निकटच्या लोकांजवळ आपले मन मोकळे करा. यातून निश्चितच मार्ग निघू शकतो. जगात असा कोणताच प्रश्न नाही की त्यावर उत्तर नाही. उत्तर हेच अंतिम सत्य आहे. आत्महत्या किंवा नैराश्य हे त्यावर उत्तर नाही. आनंद, समाधान, यश जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समाजातील नकारात्मकता कमी होईल आणि एक आंनदी व स्वस्थ समाज निर्माण होईल.