नवी दिल्ली – कोविडच्या काळात जेईई आणि नीट परीक्षा घेण्याला अनेक विद्यार्थी आणि पालकांचा सक्त विरोध आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करून सर्वसहमतीने निर्णय घ्यावा, असे आवाहन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
या परीक्षा घेण्यास विरोधी पक्षांचा विरोध आहे, तसेच सहा राज्यांनी या संबंधात सर्वोच्च न्यायालयाकडेही धाव घेतली आहे. कॉंग्रेसने देशभरात या परीक्षांच्या विरोधात निदर्शने आयोजित केली होती. तसेच या विषयी सोशल मीडिया यावरूनही कॉंग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. त्याच मोहिमेचा भाग म्हणून राहूल गांधी यांनीही ट्विटरवरून या निर्णयाच्या विरोधात आपला आवाज उठवला.
त्यांनी म्हटले आहे की, सरकारच्या अपयशामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होता कामा नये, सरकारने या संबंधात सर्वांशी चर्चा करून सहमतीने निर्णय घेतला पाहिजे. या संबंधी एक व्हिडीओ संदेशही राहुल गांधी यांनी जारी केला आहे.
देशातील करोना स्थिती तसेच त्यानंतर आर्थिक स्थिती अत्यंत ढिसाळपणाने हाताळण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. आता या साऱ्याची किंमत विद्यार्थ्यांनी का चुकवायची आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला आहे. सरकारने विद्यार्थ्यांवर परीक्षांची सक्ती करता कामा नये, असेही राहुल गांधी यांनी या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.