मुंबई – आमदार सुदिन ढवळीकर, आमदार विजय सरदेसाई, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह गोव्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “देशातील विरोधी पक्षांचे नेते असलेल्या अनेक नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत. गोव्यातील फोन टॅपिंग प्रकरणात तेथील जनतेपुढे सारी माहिती नुकतीच उघड झाली आहे. महाराष्ट्रात भाजपने जो फोन टॅपिंगचा पॅटर्न चालवला तोच पॅटर्न त्यांनी गोव्यात राबवला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात फोन टॅपिंग करणाऱ्या सरकारचे प्रमुखच गोव्यात प्रभारी आहेत हा योगायोग नाही अशी कोपरखळी मारत त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गोव्यातील या फोन टॅपिंग प्रकरणाच्या रश्मी शुक्ला कोण आहेत असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हा सवाल केला.