संतोष पवार
सातारा -करोना विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरु झालेला लॉकडाऊन कंटाळवाणा व नव्या चिंता निर्माण करणारा असला तरी नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणाराही ठरू लागला आहे. कमी होणारे प्रदूषण, पुरेशी विश्रांती, सुधारलेली जीवनशैली, कमी झालेला ताणतणाव यामुळे नागरिकांचे किरकोळ असणारे आजार व यातील सातत्य असणारे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी सातारा शहर आणि परिसरातील खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्याही कमालीची घटली आहे.
ग्रामीण भागात ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रातही करोना संशयित वगळता अन्य रुग्ण कमी झाले आहेत. अनेक खासगी दवाखाने रुग्णांअभावी ओस पडले आहेत.वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि अंगदुखी याचे किरकोळ रुग्ण सोडले इतर आजारांच्या प्रमाणात घट झाली आहे. दीर्घकालीन असणारे आजार व पाण्यापासून बाधित होणारे आजार यांची संख्या अधिक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे यामध्येही संख्या रोडावली आहे. हे सगळे करोनामुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनशैली बदलल्याचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनमुळे खासगी दवाखाने बंद आहेत तर काही डॉक्टर माणुसकी दाखवत प्रशासनाच्या सूचनेची अंमलबजावणी करत आरोग्य सेवा देत आहेत. या अल्प प्रमाणामुळे दवाखान्यात नागरिकांना जाणे जमत नाही. दुसरीकडे वाहने बंद झाल्याने प्रदूषण कमी झाले आहे. वेळ भरपूर असल्यामुळे आरामाचे प्रमाण वाढल्यामुळे आजार सध्या दुरापास्त झाला आहे. ग्रामीण भागात शेतातील कामांना प्राधान्य दिले जात असल्याने शरीराच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.
ही आहेत आजारी न पडण्याची कारणे
आजार पळवणारी अनेक कारणे आहेत. प्रदूषणातील घट, बाहेरील अन्न खाण्याचे प्रमाण कमी, मास्कमुळे संसर्गाच्या प्रमाणात घट, पुरेशा विश्रांतीमुळे रोग प्रतिकारशक्तीत वाढ, वेळेत झोप, वेळेत जेवण, कुटुंबातील लोकांशी संवाद, छंद जोपासल्याने मानसिक स्वास्थ्य, योगासन व व्यायाम करण्यासाठी भरपूर वेळ. अशा कारणांमुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण घटले आहे.
जीवनशैलीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. ताणतणाव, दगदग व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण कमी झाले. व्यसनाधीनचे प्रमाण घटले. लॉकडाऊनच्या काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन जीवनशैलीमध्ये सातत्य ठेवल्यास आरोग्य उत्तम व निरोगी राहू शकते. लॉकडाऊनमध्ये मांसाहार वर्ज्य झाला. हात धुण्यासारखी वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवून लोक काळजी घेऊ लागल्याने आजारांचे प्रमाण कमी झाले आहे.
-डॉ. सुहास माने (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा)