नवी दिल्ली – भारताची युवा महिला गिर्यारोहक बलजित कौर हिने ल्होत्से हे 8516 मीटर उंचीवरील शिखर सर करत इतिहास रचला. चार अष्टहजारी शिखरे सर करणारी बलजित भारताची पहिलीच महिला गिर्यारोहक ठरली आहे.
बलजितने 28 एप्रिल ते 22 मे या 25 दिवसांच्या कालावधीत 8 हजार मीटरपेक्षाही जास्त उंचीवर असलेली चार शिखरे सर केली. मूळची हिमाचल प्रदेशची असलेल्या बलजितने मिंगमा शेर्पा यांच्या सहकार्यामुळे ही कामगिरी केली. तिने 28 एप्रिलला अन्नपूर्णा हे 8 हजार 091 मीटचे शिखर सर केले.
त्यानंतर तीने कांचनजुंगा हे 8 हजार 586 मीटर उंचीचे शिखर सर केले. जगातील सर्वोच्च शिखर मानले जात असलेले माउंट एव्हरेस्ट हे 8 हजार 848.86 मीटर उंचीचे शिखऱही तिने 21 मे रोजी सर करत तेथे तिरंगा फडकाविला. व त्यानंतर रविवारी तीने ल्होत्सेही सर करत विक्रम साकार केला.
एव्हरेस्टसह ल्होत्सेही केवळ 22 तासांत सर करणारी बलजित भारताची दुसरीच महिला गिर्यारोहक ठरली. यापूर्वी पश्चिम बंगालच्या चंदा गायेन यांनी 2013 साली ही कामगिरी केली होती.