कोलकाता – भारतीय जनता पार्टीची राजवट ही हिटलर, मुसोलिनी तसेच स्टॅलीन यांच्या राजवटीपेक्षाही वाईट आहे, अशा शब्दांत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या कोलकातामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
केंद्र सरकारने नुकतीच इंधनदरात कपात केली आहे. तसेच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपयांची सबसीडी जाहीर केली आहे. या निर्णयावरदेखील ममता यांनी टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपकडून लोकप्रिय निर्णय घेतले जातात. दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या थोड्याच लोकांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळतो. बाकीचे गरीब लोक घरगुती गॅस कसा खरेदी करतील., असा सवाल ममता यांनी केला आहे.
केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थाचा वापर करण्यात येत आहे. तसेच देशाच्या व्यवस्थेवर भाजपाकडून हल्ला केला जातो आहे. त्यांनी वेगवेगळ्या संस्थांना स्वायत्तता दिली पाहिजे. त्यांना स्वंतंत्रपणे काम करु दिले पाहिजे, असे मत व्यक्त ममता यांनी व्यक्त केले.
कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय संस्थांना आपले काम करू देणे हेच लोकशाहीसाठी आवश्यक आणि महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही काळापासून ममता आणि बंगालचे राज्यपाल यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे. तसेच त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या पत्नी रूजिरा यांना ईडीने चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. त्यामुळे ममता केंद्र संघर्ष आगामी काळात चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.