मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कालच्या पुण्यातील भाषणात अनेक अर्थ दडलेले आहेत. त्यांचे भाषण गांभीर्याने घेण्याची गरज आहे व त्यावर विचार करण्याचीही गरज आहे, असा सल्ला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे.
ते म्हणाले की राज यांचे कालचे भाषण हे राजकीय दृष्ट्या अत्यंत परिपक्व आणि प्रगल्भ असे होते. त्यांनी अत्यंत वैचारीक पध्दतीने मांडणी केली होती. परिपक्व राजकारणी म्हणून त्या भाषणाकडे बघण्याची आवश्यकता आहे. भाजपाच्या बृजभूषण सिंह या एका खासदाराला तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गप्प करु शकत नव्हते का? हे ते बोलले.
भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचे राज यांच्या भाषणावरून दिसून आले. त्यांचे खरे रुप काय, त्यांनी काढलेली नखे राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. म्हणून हे भाषण राजकीय प्रगल्भतेने घेण्याची गरज आहे. गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे म्हणतोय.
महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांना मी विनंती वजा आवाहन करेल की कालचे राज ठाकरेंचेभाषण किंवा त्यांचा रद्द झालेला अयोध्या दौऱ्याच्या मुद्द्याला कुणीही हवा देण्याचे काम करु नये, कुणीही चेष्टेचा विषय करु नये असेही जाधव यावेळी म्हणाले.