नगर – नगर तालुक्यातील पारगाव भातोडी गावाला सुमारे 700 एकरांचा ऐतिहासिक तलाव लाभला आहे. याच तलावात शहाजी राजांची ऐतिहासिक लढाई झाली. शहाजी राजांचे बंधू शरीफ राजे येथे शहीद झाले.
हा ऐसिहासिक वारसा जपण्यासाठी भातोडी तलावाचा विकास करु, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल दिल्याची माहिती व्याख्याते गणेश शिंदे यांनी दिली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या या तलावाला ब्रिटिशांनी संरक्षक भिंत बांधली तसेच या तलावाच्या शेजारी ब्रिटीशांचे छोटेखानी विश्रामगृह आहे. या तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण केल्यास पारगाव येथील ऐतिहासिक तलाव पर्यटन केंद्र ठरू शकते. त्यासाठीच व्याख्याते गणेश शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन तलावाच्या दुरुस्ती व सुशोभीकरण संदर्भाने सविस्तर चर्चा केली.
जवळच असलेला चांदबीबी महाल, हेमाडपंथी नृसिंह मंदिर, वघेश्वरी मंदिर, शरीफजी राजे यांची समाधी, यामुळे पर्यटक पारगावच्या तलावाकडे आकर्षित होऊ शकतात. त्यासाठी तलावातील गाळ काढणे, तलावाची दुरुस्ती करणे, गळती थांबवणे, धोबीघाट बांधणे, विश्रामगृह दुरुस्त करणे, व तलावाचे सुशोभीकरण करणे यासाठी जलसंपदा, पर्यावरण व पर्यटन विभागाकडून एकत्रित तलाव सुशोभीकरण कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे, अशी भूमिका व्याखाते गणेश शिंदे यांनी मांडली.
त्यावर या संदर्भात कृती आराखडा तयार करण्यासाठी लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.