नारायणगाव (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पर्यावरण पुरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पर्यारणांशी नाते जोडूया, पक्ष्यांशी मैत्री करुया हा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी म्हटले आहे.
ऊन्हाचा तडाखा वाढलेला असून पक्षी पाणी व अन्नासाठी सैरभैर झालेले आहे. त्यामध्ये चिमणी सारखा छोटा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्या सरंक्षणांची व अन्न पाण्याची जबाबदारी जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील बालचमूने हाती घेतली आहे.
जुन्नर तालुक्यातील आदिवासी परिसरातील भोसलेवाडी, नारायणगांव नंबर-2 ऊर्दु शाळा, बुचकेवाडी, काटेडे, शिरोली बोरी, ओझर नविन, आपटाळे, उच्छील, आंबोली, वानेवाडी, विरणकवाडी, भिवाडे, डामसेवाडी, संत तुकाराम विद्यालय निरगुडे, पूर्व भागातील जि.प.आनंदवाडी, वडगाव आनंद, कुमशेत, आर्वी शाळा उपक्रमात सहभागी झालेल्या आहेत.
आपल्या सभोवतालच्या परिसरातील शाळा इमारत, शाळेतील झाडेझुडपे यावर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पालापाचोळा, नारळ, करवंटीच्या सहाय्याने चिमण्यासाठी निवारे तयार केले आहेत. जुनी मातीची भांडी, छोटेछोटे पाण्यासाठी डबे यामध्ये पाणी ठेवून पक्षांची पाण्याची गरज पूर्ण केली जात आहे. चिमण्यांची भूक भागवण्यासाठी घरातील धान्य व उरलेल्या तांदळांची कण विद्यार्थी पक्ष्यांच्या घरट्यात ठेवतात.
एक घास चिऊचा तर दुसरा घास माझा याप्रमाणे प्रत्येक शाळेत पाहायला मिळते.जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून तालुक्यात विविध शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत.