हैद्राबाद – देशभरामध्ये सध्या लॉक डाऊनचा दुसरा टप्पा सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अत्यावश्यक असलेला लॉक डाऊन परराज्यात अडकून पडलेल्या मजुरांसाठी मात्र भयावह ठरतोय. लॉक डाऊनमुळे सध्या या मजुरांच्या हातचा रोजगार नाहीसा झाला असून त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी सरकारी मदतीवर विसंबून राहावं लागतंय.
या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झालेले मजूर काही ठिकाणी रस्त्यावर येऊन आपल्याला घरी परतण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करतायेत. अशातच आज हैद्राबाद येथील आयआयटी इमारतीच्या बांधकामासाठी परराज्यातून आलेल्या मजुरांनी देखील परतीच्या प्रवासाची परवानगी मागण्यासाठी आंदोलन केलं आहे.
तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबाद येथे आयआयटी विद्यालयाच्या बांधकामासाठी आलेले जवळपास २४०० मजूर लॉक डाऊनमुळे येथे अडकून पडले आहेत. या मजुरांनी आज सकाळी एकत्र येत आपल्याला स्वगृही परतण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली. याबाबतची माहिती संगारेड्डी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत मजुरांना परतवले.